लाचखोरीत नेहमी प्रथम क्रमांकावर असणाऱ्या पुणे विभागाला मागील वर्षी नाशिकने मागे टाकले असताना या वर्षीही हा उच्चांक नाशिक विभाग तथा त्यातील कोपरगाव तालुका पुढे सुरू ठेवील असे चित्र दिसत असून काल सायंकाळी पुन्हा धारणगाव येथील तलाठी धनंजय गुलाब पऱ्हाड आणि त्यांचा पित्या सागर उर्फ बबलू सुरेश चौधरी लाच घेताना पकडले असून तलाठी पऱ्हाड मात्र परागंदा झाला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या राज्यात आणि विशेषतः कोपरगाव तालुक्यात महसूल,जलसंपदा,बांधकाम,महावितरण आणि पोलिस आदींना लाच दिल्याशिवाय कोणतेही शासकीय काम होत नाही,असा सर्वसामान्य नागरिकांचा अनुभव आहे.दुसरीकडे, ‘एसीबी’च्या पथकाचे सापळे कमी झाले आहेत.तक्रारीचे प्रमाण कमी झाल्याने सापळ्यामध्ये घट झाली असल्याचे अधिकारी सांगतात.तक्रार येऊनही पुरेसे पुरावे मिळत नसल्याने ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांची अडचण होत असल्याचेही म्हटले जाते.त्यामुळे लाचखोरी कमी झाली नाही तर सापळे घटल्याने लाचखोर पकडले न गेल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.मात्र उत्तर नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्याने याबाबत आपला लौकिक अद्याप राखून ठेवला आहे.कालही त्याची प्रचीती आली आहे.
कोपरगाव तालुक्यात महसूल,पोलिस अधिकारी आणि वाळूचोरांनी गोदावरी नदी उजाड केली असून अद्यापही प्रशासन वाळू उपसा थांबविण्यास तयार नाही.त्यामुळे शेती व्यवसाय उजाड होणार हे उघड गुपित आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.वर्तमानात माहेगाव देशमुख,सूरेगाव,मायगाव देवी आदी तीन वाळू डेपो सुरू असून यात महसूल,पोलिस आदी घटकांचा मोठा आर्थिक घोटाळा सुरू आहे.त्यातच तीन दिवसापूर्वी शिर्डी प्रांताधिकारी माणिक आहेर यांनी मोठे धाडस करून स्थानिक महसुली अधिकाऱ्यांना उघड करण्यासाठी धाड टाकून काही वाळूचोरांच्या मुसक्या आवळल्या होत्या.मात्र महसूल आणि पोलिसांना हप्ता द्यायचा आणि धाडी टाकायच्या हे सूत्र बहुधा वाळूचोरांना आवडले नसावे असे दिसून येत असून त्यांनी महसूल विभागाला धडा शिकविण्याचा चंग बांधला आहे.त्यातूनही काल अहिल्यानगर येथील लाचलुचपत विभागाने एका व्यावसायिकाच्या (वय-३५)(या आधी सदर तक्रारदाराने अनेक तक्रारी केल्या असून त्यात अनेक जण निलंबित झाले आहे) तक्रारी वरून काल सायंकाळी ५.५० वाजता कोपरगाव बस स्थानकासमोर सापळा लावला होता.त्यात धारणगाव येथील कार्यरत तलाठी धनंजय गुलाब पऱ्हाड रा.जानकीविश्व,गणेश कोचिंग क्लासचे मागे कोपरगाव आणि त्यांचा पित्या सागर उर्फ बबलू सुरेश चौधरी यांनी फिर्यादी इसम वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर विरुध्द कारवाई न करण्यासाठी स्वतः साठी १० तर कोपरगाव येथील मंडलाधिकारी (मच्छिंद्र ?) पोकळे याचेसाठी (ही लाच त्यास स्वतः आणि तालुक्याचे वरिष्ठ महसुली अधिकारी याचसाठी असल्याचे मानले जात आहे) १० हजार अशी एकूण २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले असून तलाठी पऱ्हाड मात्र परागंदा झाला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.९१/२०२५ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७,७(अ),१२ प्रमाणे आज पहाटे ५.५६ वाजता (संशयास्पद रित्या तब्बल बारा तासांनी) लाच लुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली लाच लुचपत विभागाच्या पोलिस निरीक्षक छाया देवरे या करत आहेत.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने अधिकची माहिती घेण्यासाठी शिर्डीचे प्रांताधिकारी माणिक आहेर व कोपरगाव येथील तहसीलदार महेश सावंत यांचेशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने घेतलेल्या माहितीनुसार कोपरगाव तालुक्यात या आधी विजय बोरुडेसह दोन तहसीलदार,(एक रॉकेल प्रकरणात) तर एक महसूल सहाय्यक चंद्रकांत नानासाहेब चांडे,अव्वल कारकून योगेश दत्तात्रय पालवे,रांजणगाव देशमुख येथील तलाठी गणेश कांगणे,सुरेगाव येथील तलाठी श्री कवडे,येसगाव येथील महिला तलाठी ज्योती वसंत कवळे,कोपरगाव येथील तलाठी गणेश सोनवणे,धोत्रे येथील तलाठी सुशील राजेंद्र शुक्ला,कुंभारी येथील तलाठी सुनील मच्छिंद्र साबणे असे सात तलाठी असे एकूण दहा जणांना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकावे लागले असून वर्तमान धारणगाव येथील तलाठी धनजंय पऱ्हाड व त्याच्यासाठी काम करणारा शेतकरी (सु)पुत्र सागर चौधरी असे मिळून बारा जण जाळ्यात अडकले आहे.पोलिस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा यात समावेश नाही.