शिर्डी | प्रतिनिधी :
साईनगरी शिर्डीच्या रस्त्यांवर, मंदिर परिसरात आणि शहरातील विविध भागांत फिरणाऱ्या भिक्षेकऱ्यांविरोधात शिर्डी शहर पोलिसांनी आता धडक मोहीम हाती घेतली आहे. भल्या पहाटेच पोलिसांनी शहरभर मोर्चा वळवत विशेष कारवाई करत तब्बल ६८ महिला-पुरुष भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे शहरात भिक्षेकऱ्यांच्या वाढत्या वावराला चाप बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
शिर्डी शहर पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने शहरातील विविध भागांत ही विशेष मोहीम राबवली. शिर्डी नगरपरिषद तसेच श्री साईबाबा संस्थानच्या सहकार्याने करण्यात आलेल्या या कारवाईत मोठ्या संख्येने भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेण्यात आलेल्या ६८ जणांपैकी ५६ पुरुष भिक्षेकऱ्यांना विसापूर येथील भिक्षेकरी गृहात, तर १२ महिला भिक्षेकऱ्यांना चेंबूर येथील भिक्षेकरी गृहात पाठविण्यात आले आहे.

साईनगरीच्या प्रतिमेला धक्का देणाऱ्या प्रकारांवर पोलिसांचा ‘अॅक्शन मोड’
देशभरातून लाखो भाविक शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. मंदिर परिसर, बाजारपेठ, प्रमुख रस्ते आणि भाविकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भिक्षेकरी फिरताना दिसत असल्याने शहराची स्वच्छता, शिस्त आणि पर्यटननगरीची प्रतिमा याबाबत प्रश्न उपस्थित होत होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे.
विशेष म्हणजे, केवळ एकदाच कारवाई करून थांबण्याऐवजी शहरातील भिक्षेकऱ्यांच्या वावरावर सातत्याने लक्ष ठेवण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘कारवाई थांबणार नाही’; पोलीस निरीक्षक गलांडे यांचा इशारा
“शिर्डी शहरातील भिक्षेकऱ्यांविरोधात यापुढेही अशाच प्रकारची मोहीम राबविण्यात येणार आहे,” अशी माहिती पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी दैनिक साई दर्शनशी बोलताना दिली.
शिर्डीची स्वच्छता, सुरक्षितता आणि साईनगरीची प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी पोलीस, नगरपरिषद आणि संस्थान यांच्या समन्वयातून पुढील काळातही अशा मोहिमा सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील भिक्षेकऱ्यांच्या प्रश्नावर प्रशासनाने आता ‘एकदाची कारवाई’ नव्हे, तर सातत्यपूर्ण मोहिमेचा मार्ग स्वीकारल्याचे दिसून येत आहे.