
शिर्डी (प्रतिनिधी)
आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली असून आत्तापासूनच निवडणुकीच्या तयारीची मोर्चे बांधणी होत आहे.
शिर्डी येथील श्री साईबाबा एम्प्लॉईज सोसायटी ली. ही संस्था राज्यात एक आर्थिक उलाढालीत मोठी संस्था आहे. या संस्थेत सुमारे दीडशे कोटीचा आर्थिक व्यवहार वार्षिक असून 70 ते 75 कोटी ठेवी आहेत तर चार ते पाच कोटीचा वार्षिक नफा होत असल्याचे समजते. या संस्थेमध्ये आतापर्यंत वीस वर्ष विखे गटाची सत्ता आहे. मात्र यावेळी गणेश कारखान्याच्या निवडणुकीमध्ये माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात व कोपरगाव चे विवेक कोल्हे यांच्या गटाने सत्ता मिळवली. नंतर राहता तालुक्यातील काही ग्रामपंचायतीत सत्ता मिळाल्यानंतर या शिर्डीच्या संस्थेतही निवडणूक लढवण्याची तयारी विखे विरोधी गटाने सुरू केली आहे. श्री साईबाबा संस्थान कर्मचारी निवडणुकीसाठी विखे गटाचे विरोधात कामगार हितासाठी व कामधेनू वाचवण्यासाठी परिवर्तन विकास मंडळ पॅनल होणार असल्याचे व या निवडणुकीत परिवर्तन घडणार असल्याचे या सोसायटीचे विद्यमान संचालक विठ्ठल पवार यांनी म्हटले असून त्यांनी दैनिक साई दर्शनला प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले की, ही संस्था श्री साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेली संस्था आहे. मात्र येथे बाहेरून राजकारण करून दबाव तंत्राचा वापर केला जात होता.
पण यापुढे संस्थान कर्मचारी स्वाभिमानी असुन या संस्थेचा राजकीय अड्डा कोणी बनवला व संस्थेचे सभासद यांना हे सर्व माहित आहे. या संस्थेमध्ये राजकारण न करता पारदर्शी निस्वार्थी व सर्वांना बरोबर घेऊन या संस्थेचा अधिकाधिक विकास होण्यासाठी संस्थान कर्मचारी व पतसंस्थेच्या सभासदांना अधिकाधिक संस्थेमार्फत लाभ, सुविधा मिळण्यासाठी यापुढे प्रयत्न होणार आहे व त्यासाठी येणारी ही निवडणूक सभासदांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. असे या पत्रकात या सोसायटीचे विद्यमान संचालक विठ्ठल पवार यांनी म्हटले आहे.
यासंस्थेत सध्या सत्ताधारी संचालक मंडळ महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ.सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहत असून गेल्या सुमारे 20 वर्षांपासून विखे पाटील समर्थकांचा वरचष्मा या संस्थेवर राहिला असून यंदाच्या निवडणुकीत मात्र इतर राजकीय पक्षांचा हस्तक्षेप पहावयास मिळण्याची शक्यता आहे.
तसे पाहता साईबाबा संस्थान शी संलग्न असलेल्या या संस्थेच्या पदाधिकारी, कर्मचारी,सभासदांना साईबाबा संस्थान 2004 अधिनियम नुसार कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न राहता येत नाही मात्र या संस्थेच्या निवडणुकीसाठी यंदा इतर राजकीय पक्षांचा हस्तक्षेप होण्याची शक्यता दाट असून 2004 च्या अधिनियमाला यंदा सुद्धा हरताळ फासला जातो की काय अशी कर्मचारी वर्गामध्ये चर्चा आहे. या निवडणुकीसाठी तीन पॅनल होण्याची शक्यता वर्तवली जात असून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,खा. डॉ .सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पॅनल तर संस्थेचे संचालक विठ्ठल पवार यांचे परिवर्तन विकास पॅनल उभे राहण्याची शक्यता आहे.
कामगारांच्या प्रश्नांवर सतत आवाज उठविणारे व संस्थेच्या प्रत्येक मीटिंग मध्ये सत्ताधारी मंडळीच्या चुकीच्या धोरणांवर मुद्देसूद टीका करत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत कर्मचाऱ्यांचा आवाज बुलंद करणारे संचालक विठ्ठल पवार यांच्या वतीने उमेदवार उभे करत तिसरा पॅनल होण्याची शक्यता आहे .विठ्ठल पवार यांनी बँक ऑफ बडोदा च्या अधिकाऱ्यांशी कागदोपत्री लढा देत एका कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला अपघात विमा म्हणून तब्बल 40 लाख रुपये मिळवून दिल्याने तसेच वेळोवेळी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहत त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारणारे पवार यांच्यासाठी ही जमेची बाजू ठरू शकते. मात्र या निवडणुकीत कोण बाजी मारेल . हे सभासदांच्या हातात असून सभासद मात्र अजून उघड बोलण्यास तयार नाहीत. मात्र निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल. असे बोलले जात आहे.