
शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी मध्ये ग्रो मोर ट्रेडिंग कंपनीच्या नावाखाली कोट्यावधी रुपये मोठमोठी अमिषे दाखवून गुंतवणूक केली व आता गुजरात मधील एका मोठ्या गुंतवणूकदारांच्या फंडवर ट्रेडिंग चालू आहे. असे खाजगीत या ट्रेडिंग कंपनीकडून बोलले जात असल्याचे सूत्रांकडून समजते. जर गुजरातच्या एका मोठ्या गुंतवणूकदारांच्या फंडवर ही ट्रेडिंग चालू आहे तर मग शिर्डीत गुंतवणूकदारांकडून जमा केलेले चारशे ते पाचशे कोटी गुंतवणुकीचे झाले काय ?
असा प्रश्न सर्वसामान्य गुंतवणूकदारांमधून होत आहे. शिर्डीत ग्रोमोर ट्रेडिंग नामक कंपनी स्थापन करून शिर्डीतील एका बड्या संस्थेतील अनेक कर्मचाऱ्यांकडून तसेच इतर व्यावसायिक व नागरिकांकडून येथे व्याजाचा मोठा परतावा दिला जाईल असे आमिष दाखवून मोठी गुंतवणूक जमा केली. सुरुवातीला परतावा चांगला देण्यात आला. मात्र आता नंतर टाळाटाळ होत आहे.
यासंदर्भात या कंपनीचे चालक-मालक भूपेंद्र नामक व्यक्तीशी गुंतवणूकदारांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता .मात्र ते गुजरातला गेले .24 मार्चपासून त्यांच्यासोबत डायरेक्ट पर्सनल संपर्क झाला नव्हता. मात्र मागच्या काही दिवसापासून यासंदर्भात संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यानंतर नुकतेच बोलणे झाल्याचे एका गुंतवणूकदारांने खाजगीत म्हटले आहे.
यावेळी भूपेंद्रने माहिती दिली आहे की, गुजरात मध्ये कोणी एक मोठे गुंतवणूकदार आहेत त्यांच्या फंड्सवर ट्रेडिंग चालू आहे. पाच सात जवळच्या नातेवाईकांसोबत सतत संपर्कात आहोत. पार्ट पेमेंट करण्याबद्दल इच्छा आहे. पण त्याने ट्रेडिंग कॅपिटल कमी होईल .तरी थोडेफार पार्ट पेमेंट करण्याचा विचार करून ते टेलिग्राम वर अपडेट देतील.
कार्यालयीन अपडेट साठी ग्रुप वर कंपनीशी संपर्क करावा. पेआउट प्रक्रियेमध्ये आम्ही सहभागी नाही. कोणाला कधी आणि किती पे आऊट करायचे हा निर्णय पूर्णपणे ग्रोमोर चा आहे. असेही म्हटले आहे. या पोस्टमुळे आणखीनच गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. कारण शिर्डी मधून मोठी रक्कम गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक म्हणून जमा केलेली आहे. मग गुजरात मधील एका मोठ्या गुंतवणूकदारांच्या फंडवर ट्रेडिंग कशासाठी चालू आहे,
शिर्डीतील जे पैसे जमा केले आहेत ते कोठे आहे. ट्रेडिंग कंपनीच्या नावाने मोठी रक्कम गोळा करून मोठी रक्कम व्याज स्वरूपात परतावा प्रथम देण्यात आला नंतर टाळाटाळ होत आहे. लाखो रुपये मिळत असताना इन्कम टॅक्स सरकारचा बुडवला जात होता की काय ?याचीही आता चर्चा होत आहे. एखादी व्यक्ती अचानक श्रीमंत झाली किंवा मोठी संपत्ती त्याच्याकडे आली तर ईडी किंवा सरकारच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने तात्काळ चौकशी केली जाते.
मग या ट्रेडिंग कंपनीचे चालक मालक यांची अचानक संपत्ती वाढली, ती कशी वाढली, नाशिकच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला एवढा मोठा खर्च कुठून करण्यात आला, याची शासकीय व आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करणे गरजेचे आहे. जे काही सत्य आहे ते उघड होणे आवश्यक असून गुंतवणूकदार किंवा सर्वसामान्य नागरिक किंवा शासकीय यंत्रणेला या ट्रेडिंग कंपनीचे व्यवहार व सर्व काही स्पष्ट भूमिका समजणे आवश्यक आहे.
नुसते जून एंडिंग पर्यंत वाट पाहावी असे भावनात्मक साथ घालून उपयोग होणार नाही. हे वेळ काढू पणाचे धोरण किती दिवस ट्रेडिंग कंपनी अवलंबणार, काही दिवसांपूर्वी हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर व्हिडिओद्वारे गुंतवणूकदारांना आपण शिर्डीत येऊन प्रत्यक्ष भेटणार! असे भावनात्मक आवाहन केले गेले होते त्यालाही आता अनेक दिवस लोटले आहेत.
पण अजूनही प्रत्यक्ष काय फोनवरही भेट होत नाही . अशी चर्चा गुंतवणूकदारांमध्ये खाजगीत होत आहे. तरी जी काही कंपनीची स्पष्ट भूमिका आहे ती जाहीररीत्या सांगणे आजच्या घडीला गरजेचे आहे. त्याचप्रमाणे शासकीय आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने या कंपनीची चौकशी होणे गरजेचे आहे. कारण शेवगाव कोल्हापूर सातारा संभाजीनगर आदी ठिकाणी अशाच ट्रेडिंग कंपनीच्या चालक मालकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. असा प्रकार शिर्डीत होतो की काय?
अशी भीती गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाली असून आमचे गुंतवणूक केलेले पैसे परत मिळावे, असे गुंतवणूकदारांमधून खाजगीत बोलले जात आहे. अन्यथा आता आम्ही शांत बसणार नाही, या विरोधात आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही, असेही खाजगीत गुंतवणूकदार बोलत आहेत.