
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा करण्यात आली आहे.निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे आजच विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजलं आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत येत्या 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यापूर्वी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे, त्यानुसार आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रात दिवाळीनंतर म्हणजे 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला मजमोजणी पार पडणार आहे.
जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं यासाठी आपले प्रयत्न राहाणार असल्याचं निवडणूक आयुक्तांनी सांगितलं. सिनिअर सिटिझन्स आणि दिव्यांग व्यक्तींना घरातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेचं व्हिडिओ शुटिंग केलं जाणार आहे. मतदान केंद्राबाहेर जास्त रांग असेल तर मतदारांच्या सुविधेसाठी खुर्च्या ठेवल्या जाणार आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदावारांची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहे.
पैसे, मद्य, ड्रग्स वाटपयावर कडक नजर ठेवली जाणार आहे. मतदान केंद्र दोन किलोमीटरच्या आत असावेत असं सूचना करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष फुटल्यानंतर विधानसभेची पहिली निवडणूक होत आहे.
त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल. महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलं जात असून येत्या काही दिवसात उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं महत्त्वाची ठरणा आहे.
राज्याच्या 288 विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत रंगणार आहे. महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा समावेश आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभेत स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.