
शिर्डी (प्रतिनिधी) –शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानमध्ये विविध ठेकेदारांमार्फत सेवेत असलेल्या कंत्राटी कर्मचा-यांना महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ नुसार अद्याप सरकारी व किरकोळ रजा / सुट्टया दिल्या जात नसल्यामुळे शासन स्तरावरुन योग्यती कारवाई करण्यासाठी श्री साईबाबा संस्थान असंघटीत कर्मचारी संघटना, शिर्डीच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त, अहिल्यानगर यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनामध्ये नमुद केले आहे की, श्री साईबाबा संस्थानमध्ये जवळपास २,००० कंत्राटी कर्मचारी विविध ठेकेदारांमार्फत गेली १५ ते २० वर्षांपासून सेवेत कार्यरत आहेत. तथापि, राज्य शासनाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ हा कायदा तयार करुन कंत्राटी कर्मचा-यांना भर पगारी रजा / सुटट्या व इतर लाभ / सुविधा दिलेल्या आहेत. मात्र, श्री साईबाबा संस्थानमध्ये अद्याप या कायद्याची परिपुर्ण अंमलबजावणी झालेली नाही. संस्थानने पगारी आठवडा सुट्टया दिलेल्या आहेत.
मात्र, कायद्याप्रमाणे सरकारी व किरकोळ रजा / सुट्टया दिलेल्या नाहीत. या प्रकरणी आम्ही संस्थानकडे वारंवार पाठपुरावा केलेला आहे. मात्र, त्यांनी अद्याप सदर कायद्याची अंमलबजावणी करुन, कर्मचा-यांना पगारी रजा / सुट्टया दिलेल्या नाहीत. सदर कायदा अस्तित्वात येऊन अनेक वर्ष उलटून गेले, तरीही सदर संस्थानकडून कायदा/ अधिनियमाची अंमलबजावणीस आजपावेतो टाळटाळ केली जात आहे. त्यामुळे २,००० कंत्राटी कर्मचा-यांवर अन्याय होत आहे, त्यामुळे आपण सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाई गरजेचे आहे.
तरी, आपण सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, साईबाबा संस्थानमधील कंत्राटी कर्मचा-यांना महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ नुसार शासकीय व किरकोळ रजा / सुटट्या पुर्वलक्षी प्रभावाने व तात्काळ लागू करणेकरीता शासन स्तरावरुन योग्यती कारवाई करावी,
अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनावर श्री साईबाबा संस्थान असंघटित कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र लक्ष्मण कोते, मार्गदर्शक रामराव रंभाजी शेळके, कार्याध्यक्ष सुनील रामदास कोते, उपाध्यक्ष दीपक शिवाजी तुरकणे, सचिव गोटीराम साहेबराव दाढे,
सहसचिव दत्तात्रय देवकर, खजिनदार जयेश लाडवंशी, प्रसिद्धी प्रमुख सुनील मांजरेकर, शरद बाबासाहेब मते, संघटनेचे कार्यकारी सदस्य किरण कांदळकर, महेश महाले, संदीप पवार, निलेश गोंदकर, अमोल राजूरकर, गोरख सुरळे, बाळासाहेब बढे, ज्ञानदेव देवराम पाचपिंड, राजेश गिगना, रामनाथ थोरात, गौतम पगारे, उमेश वाघ, राजेंद्र गोर्डे आदींची नावे आहेत.
तसेच संघटनेच्या वतीने अशोक मच्छिंद्र लोंढे यांनी सदरचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त, अहिल्यानगर यांच्याकडे सुपूर्त केले.