नरेंद्र मोदी यांनी आज आदमपूर एअरबेसवर जावून भारतीय जवानांची भेट घेतली.नरेंद्र मोदी यांनी यावेळी भारतीय जवानांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी तीनही सैन्य दलांचं कौतुक केलं. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला आम्ही घरात घुसून मारु, असा इशारा दिला.
पाकिस्तानकडून आदमपूर एअरबेसवर हल्ला करुन एअरबेस उद्ध्वस्त केल्याचा दावा केला जात होता. पण याच एअरबेसवर जावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी जवानांचं कौतुक केलं.
“तुमच्या पराक्रमामुळे आज ऑपरेशन सिंदूरची गुँज प्रत्येक कानाकोपऱ्यात ऐकू जात आहे. या प्रत्येक ऑपरेशन दरम्यान प्रत्येक भारतीय आपल्यासोबत उभा राहिला. प्रत्येक भारतीयाची प्रार्थना आपल्या सगळ्यांसोबत राहिली आहे. आज प्रत्येक देशवासी आपल्या सैनिक आणि त्यांच्या परिवारांप्रती कृतज्ञ आहे.
त्यांचा ऋणी आहे”, अशी भावना मोदींनी व्यक्त केली.नरेंद्र मोदी यांनी यावेळी भारत-पाकिस्तान तणावावेळी भारतीय वायुसेनेच्या जवानांच्या मानसिक अवस्थेबाबतही भाष्य केलं. पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ला केल्यानंतर भारतीय वायुसेनेचे पायलट पाकिस्तानच्या हवाई हद्दीत शिरले.
त्यावेळी पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केलं नव्हतं. पाकिस्तानची नागरी विमान वाहतूक सुरु होती. भारतीय हवाईदलाच्या जवानांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देताना पाकिस्तानच्या नागरी विमानांना लक्ष्य केलं नाही. जेव्हा पाकिस्तानचे नागरी विमान समोर होते तेव्हा भारताच्या वायुसेनेच्या पायलट्सची मानसिक अवस्था काय असेल, याबाबत मोदींनी आपल्या भाषणात भाष्य केलं.
“तुमचा स्पीड आणि कामाची पद्धत अशा स्तरावरची होती की शत्रू गोंधळून गेला. त्याला समजलं देखील नाही की त्याचं कसं नुकसान झालं. आमचं लक्ष्य पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना संपवणं होतं. पण पाकिस्तानने आपल्या प्रवाशी विमानांना समोर ठेवून जे षडयंत्र रचलं, मी कल्पना करु शकतो की, तो क्षण किती कठीण असेल जेव्हा नागरी विमान दिसतायत. मला गर्व आहे की, तुम्ही खूप सावधगिरीने नागरी विमानाला नुकसान न पोहोचवता कमाल करुन दाखवली. त्याचं प्रत्युत्तर तुम्ही दिलं.