आव्हाडांचा अजितदादांबाबत गौप्यस्फोट
शिर्डी: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार यांनी मला पालकमंत्रीपद देण्यात टाळाटाळ केली. एवढेच नव्हे तर करोना झाला तेव्हा मला मिळालेले पालकमंत्रीपद दोन तासांमध्ये काढून घेतले. त्यावेळी मी पक्षात इतका सावत्र होतो का, असे वक्तव्य शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले.
ते बुधवारी शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शिर्डीत शरद पवार गटाच्या निवडक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला शरद पवार गटाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, अजित पवारांना रायगडचे पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना द्यायचे होते. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी मला पालकमंत्रीपद मिळणारच नाही, अशी तजवीज केली, असा आरोप आव्हाड यांनी केला.