
शिर्डी मतदारसंघातील राहाता तालुक्यात बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान करून स्त्री भ्रूणहत्या केल्या जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला असून या संतापजनक प्रकाराविरोधात भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी थेट राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आबिटकर यांची मुंबई येथे भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे.
राहाता तालुक्यात काही ठिकाणी गुप्तपणे गर्भलिंग निदान करून मुलगी असल्याचे समजताच स्त्री भ्रूणहत्या केली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे डॉ. पिपाडा यांनी आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. राज्यभरातून लोक येथे येऊन अशा बेकायदेशीर कृत्यांना प्रोत्साहन देत असल्याची बाब अत्यंत लाजिरवाणी व समाजासाठी घातक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या अमानुष प्रकारामुळे मुलगी जन्माला येण्याआधीच तिचे अस्तित्व संपविले जात असून समाजात अत्यंत चुकीचा संदेश जात आहे. स्त्री भ्रूणहत्या थांबविणे ही केवळ प्रशासनाची नव्हे तर संपूर्ण समाजाची जबाबदारी असून अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला कोणतीही माफी दिली जाणार नाही, असेही डॉ. पिपाडा यांनी ठामपणे सांगितले.
तसेच राहाता शहरासह शिर्डी मतदारसंघाची या बेकायदेशीर कृत्यांमुळे बदनामी होत असल्याचे सांगत प्रशासनाने तात्काळ विशेष पथक स्थापन करून संबंधित रुग्णालये, सोनोग्राफी केंद्रे व डॉक्टरांची सखोल चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान आरोग्यमंत्री प्रकाशजी आबिटकर यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागाला चौकशीचे आदेश दिले असून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
“भ्रूणहत्या म्हणजे जन्माला येणाऱ्या बाळाचा खून”
राज्यात सुरू असलेल्या गर्भलिंग निदान व स्त्री भ्रूणहत्या प्रकरणावर आमदार प्रशांत बंब यांनीही विधानसभेत आवाज उठविला आहे. गर्भलिंग निदान करून भ्रूणहत्या करणारे डॉक्टर हे प्रत्यक्षात जन्माला येणाऱ्या बाळाचा खून करत असून त्यांच्यावर थेट खुनाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी ठाम भूमिका त्यांनी सभागृहात मांडली.
— प्रशांत बंब, आमदार (गंगापूर-खुलताबाद)

