
शिर्डीतील द्वारकामाई वृद्धाश्रमाचे संस्थापक श्रीनिवास यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास निधन झालंय. श्रीनिवास यांच्या जाण्यानं वृद्धाश्रमातील हजारो निराधारांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. श्रीनिवास हे आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील रहीवासी होते.
मात्र साईंच्या भक्तीपोटी त्यांनी 14 वर्षांपूर्वी शिर्डीत साईबाबांच्या मंदिरापासुन अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या कनकुरी गावाजवळ द्वारकामाई वृद्धाश्रम सुरु केलं. मुलगा असुन माता पित्यांना वाऱ्यावर सोडत त्यांना अनाथ करणारे कमी नाहीत. मात्र या अनाथ वृद्धांना आंध्रातुन शिर्डीत आणून वृद्धाश्रम उभारत शेकडो वृद्ध,अपंगांना श्रीनिवासनं सहारा दिला. पोटाला चिमटे घेऊन लहानाच मोठ करणाऱ्या आई वडीलांना उतरत्या वयात कशा यातना देतात
हे या वृद्धाश्रमात आल्यावर समजतं. आज या वृद्धाश्रमात, देशातील अनेंक राज्यातील तब्बल 500 वृद्ध, अपंग अनाथ राहतात.आश्रमाचे संस्थापक श्रीनिवास हे मुळ विजयवाडा येथील रहिवासी मात्र शिर्डी साईबाबांचे परमभक्त असल्यानं त्यांनी साईबाबांची सेवा म्हणून हैद्राबाद येथील एका साई मंदिरात साई सेवा केली.
त्यावेळी अनेक वृद्ध भक्त मंदिरात येत होते. त्यातील काही भक्त घरात सर्व काही असताना मुलगा सांभाळ करत नसल्यानं त्यांचे प्रचंड हाल होत असल्याचं श्रीनिवास यांच्या लक्षात आलं. काही भाविक ही त्यांना म्हणाले, की साईबाबांचा दर्शना बरोबर कुठं एक अनाथ आश्रम असेल तर बरं होईल,
म्हणून श्रीनिवास यांनी हैद्राबाद येथील काही लोकांचं एक ट्रस्ट स्थापन केलं. यानंतर एक वृद्धाश्रम स्थापन करण्याचं ठरवलं आणि या ट्रस्टचे अध्यक्ष पद श्रीनिवास यांनी घेत साईबाबांच्या शिर्डीत एक द्वारकामाई वृद्धाश्रम सुरू केलं.