
शिर्डी :
रंगपंचमीच्या दिवशी साईनगरीत भाविकांची मोठी गर्दी असताना अज्ञात चोरट्यांनी साईपालखी मिरवणुकीचा फायदा घेत दोन भाविकांचे मिळून सुमारे ८५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सौ. राजश्री संतोष ढंगारे (वय ३४) रा. साई सुमन अपार्टमेंट, शिर्डी या आपल्या पती संतोष ढंगारे यांच्यासह शिर्डीमध्ये चायनीज रेस्टॉरंटचा व्यवसाय करतात. दि. ८ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास त्या श्री साईबाबा मंदिर परिसरात निघालेल्या साईपालखी रथ मिरवणुकीचे दर्शन घेण्यासाठी पालखी रोडवरील सावता मंदिरासमोर गेल्या होत्या.
मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. दर्शन घेतल्यानंतर मिरवणुकीतून बाहेर पडत असताना त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाचे सुमारे ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मिनी गंठण चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र दागिना मिळून आला नाही.
दरम्यान, त्याच ठिकाणी दर्शनासाठी आलेले निकुंजकुमार नयनेशभाई पारेख (रा. घुटेली, ता. पेटलाल, जि. आनंद, गुजरात) यांचीही १३ ग्रॅम वजनाची सुमारे ४५ हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे उघड झाले. त्यामुळे मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हातसाफ केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी सौ. राजश्री ढंगारे यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेबाबत बोलताना पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी सांगितले की, मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथके कार्यरत आहेत. लवकरच संबंधित चोरट्यांना जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सणाच्या दिवशी आणि साईपालखी मिरवणुकीसारख्या मोठ्या धार्मिक कार्यक्रमात चोरीची घटना घडल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून पोलिसांनी सुरक्षा अधिक कडक करण्याची मागणीही होत आहे.

