
साई दरबारातच हात साफ! गर्दीचा फायदा घेऊन 1.25 लाखांचे दागिने लंपास — भाविकांमध्ये संताप
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री साईबाबा मंदिर शिर्डी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, भर गर्दीत भाविकांच्या गळ्यातील दागिने खेचण्याचे प्रकार पुन्हा समोर आले आहेत. साई दर्शनासाठी आलेल्या महिलेचे तब्बल 1.25 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
फिर्यादी स्मृती दिपक संगीत (रा. जळगाव) या 26 मार्च रोजी सकाळी सुमारे 11 वाजता मंदिराच्या गेट क्रमांक 3 येथून दर्शनासाठी रांगेत उभ्या असताना, गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 25 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र (₹85,000) व 10 ग्रॅम सोन्याची चैन (₹40,000) असा एकूण ₹1.25 लाखांचा मुद्देमाल क्षणात लंपास केला.
दर्शन करून परतल्यानंतर दागिने गायब झाल्याचे लक्षात येताच महिलेच्या पायाखालची जमीन सरकली. परिसरात शोधाशोध करूनही काहीच हाती न लागल्याने अखेर शिर्डी पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.
🔴 मंदिरातच सुरक्षा ढासळली का?
साईबाबांच्या दरबारातच अशा घटना घडत असल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हजारो भाविकांच्या उपस्थितीत चोरटे इतक्या सहजपणे हात साफ करत असतील, तर नेमकी जबाबदारी कोणाची? असा सवाल उपस्थित होत आहे.
⚠️ भाविकांनी सावध राहा!
गर्दीच्या ठिकाणी दागिने परिधान करून जाणे धोकादायक ठरत असून, अशा चोरट्यांपासून वाचण्यासाठी भाविकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
👉 एकीकडे श्रद्धा, तर दुसरीकडे चोरट्यांचा सुळसुळाट — साईनगरीत भाविकांची सुरक्षितता पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे!

