
राहाता : राहाता नगरपरिषद हद्दीतील अनधिकृत पत्राशेड व बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याबाबत वारंवार तक्रारी, स्मरणपत्रे व कायदेशीर नोटिसा देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आता सामाजिक कार्यकर्त्याला थेट रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात संबंधित सामाजिक कार्यकर्त्याने दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता राहाता नगरपरिषद कार्यालयासमोर शांततामय, अहिंसक व बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. अर्जदाराने सांगितले की, अनधिकृत बांधकामांबाबत दि. २९/०८/२०२५ रोजी मूळ तक्रार, त्यानंतर दि. १६/०९/२०२५ रोजी प्रथम स्मरणपत्र आणि दि. ०५/०१/२०२६ रोजी अंतिम कायदेशीर स्मरणपत्र नगरपरिषदेकडे सादर करण्यात आले. मात्र आजतागायत कोणतीही लेखी, प्रत्यक्ष किंवा ठोस कारवाई झालेली नाही.
सदर बांधकाम हे MRTP Act 1966 च्या कलम ५२, ५३ व ५४ चे सरळसरळ उल्लंघन करणारे असून, नगरपरिषद प्रशासनाची ही दिरंगाई कायद्याच्या अंमलबजावणीस बाधा आणणारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कायद्याने अपेक्षित असलेली कारवाई वेळेत न झाल्याने नागरिक म्हणून मूलभूत हक्कांसाठी लोकशाही मार्ग अवलंबण्याची वेळ आल्याचेही अर्जदाराने स्पष्ट केले.
अधिकाऱ्यांचे हात ओले? संशयाची सुई प्रशासनाकडे
या अतिक्रमण प्रकरणात नगरपरिषदेतील काही अधिकारी व कर्मचारी अतिक्रमणधारकांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे. प्रथमदर्शनी अधिकाऱ्यांचे ‘हात ओले’ झाल्याशिवाय इतक्या काळ कारवाई होऊ शकत नाही, असा संशयही व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घ्यावी – मागणी
या संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घ्यावी, अतिक्रमण त्वरित काढून अतिक्रमणधारकांवर कडक कारवाई करावी, तसेच अतिक्रमणाला पाठीशी घालणाऱ्या नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रस्तावित उपोषण हे पूर्णतः भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून करण्यात येणार असल्याचे अर्जदाराने स्पष्ट केले असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
प्रशासन आता तरी जागे होणार की सामाजिक कार्यकर्त्याच्या जीवावर बेतणारे उपोषण होईपर्यंत गेंड्याच्या कातडीप्रमाणे गप्प बसणार, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे

