अवैध धंद्यांना संरक्षण-खून प्रकरणात संशयास्पद भूमिका गुटखा तस्कर बंटीला शह देणारे कोण? ‘गुटखा झाडाखाली सापडला’ बनाव उघड-DGPकडे थेट तक्रार

राहाता शहरात पोलीस संरक्षणाखाली सुरू असलेल्या अवैध व्यवसाय, गंभीर गुन्ह्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आणि खून प्रकरणातील संशयास्पद भूमिकेमुळे पोलीस यंत्रणा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
या प्रकरणी थेट महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक (DGP) यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून, दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, शिर्डी नजीकच्या राहाता शहरात बिंगो जुगार, मटका, गुटखा विक्री, पत्त्यांचे क्लब तसेच वाळू तस्करी हे अवैध धंदे दिवसाढवळ्या सुरू असून, यामागे सराईत गुन्हेगार दीपक पोकळे असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या गुन्हेगारांकडे सुमारे १० डंपरच्या माध्यमातून वाळूचा अवैध व्यवसाय सुरू असून, त्यातून मिळणाऱ्या काळ्या पैशाच्या जोरावर गुंडगिरी व दहशत निर्माण केली जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
अपहरणाची FIR नोंद न घेतल्याने युवकाचा बळी
तक्रारीतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सचिन गिधे या युवकाच्या अपहरण व खून प्रकरणातील पोलीसांची भूमिका.
अपहरणानंतर सचिन गिधे यांच्या पत्नीने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली असतानाही, अपहरणाची FIR नोंदविण्यास जाणीवपूर्वक नकार देण्यात आला आणि केवळ मिसिंग नोंद घेऊन प्रकरण दाबण्यात आले.
तक्रारीत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, वेळीच FIR नोंदवून तपास केला असता तर सचिन गिधे यांचा जीव वाचू शकला असता.
मात्र पोलीसांच्या निष्काळजीपणा व संशयास्पद भूमिकेमुळे दीपक पोकळे याने अत्यंत क्रूर पद्धतीने खून करून पुरावे नष्ट केले.
आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतरच अटक
खून झाल्यानंतरही स्थानिक पोलीस दीपक पोकळे यास अटक करण्यास टाळाटाळ करत होते, असा गंभीर आरोप तक्रारीत आहे.
अखेर पीडित पत्नीने आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतरच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने हस्तक्षेप करून दीपक पोकळे यास अटक केली.
गुटखा पकडूनही आरोपीला सोडल्याचा आरोप
दरम्यान, कानकुरी येथे बंटी लहामगे याचा गुटख्याचा साठा पकडण्यात आला, मात्र पोलीसांनी माल जप्त करून नंतर “झाडाखाली सापडला” असा बनाव करत आरोपीस जाणीवपूर्वक सोडून दिल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
हा प्रकार म्हणजे पुरावे नष्ट करून गुन्हेगाराला वाचवण्याचा उघड प्रयत्न असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पोलीस अधीक्षकांमार्फत चौकशीची मागणी
या सर्व प्रकरणांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबन, विभागीय चौकशी व फौजदारी कारवाई करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, ही तक्रार राहाता पोलीस स्टेशनकडे न पाठवता थेट पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्यामार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राहाता शहरात संतापाचे वातावरण
या प्रकरणामुळे राहाता शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस–गुन्हेगार संगनमताविरोधात कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही नागरिकांकडून दिला जात आहे.
आता पोलीस महासंचालक या गंभीर तक्रारीची दखल घेऊन दोषींवर कारवाई करणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

