
अहिल्यानगर, दि. २७ : मराठी ही आपल्या संस्कृतीची, अस्मितेची आणि ऐतिहासिक परंपरेची ओळख असून तिचे जतन, संवर्धन आणि व्यापक प्रसार करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपजिल्हाधिकारी भारती सागरे, तहसीलदार नागेश गायकवाड, उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, शशिकांत नजान यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. आशिया म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होणे ही राज्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. ही मान्यता आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची, वैभवशाली साहित्यसंपदेची आणि ऐतिहासिक वारशाची पावती आहे. मराठीच्या जतन व संवर्धनासाठी सर्व स्तरांवर एकत्रित प्रयत्न होणे गरजेचे आहे.
शासनाच्या मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या धोरणाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, प्रारंभीचे शिक्षण मातृभाषेत झाल्यास विद्यार्थ्यांची आकलनक्षमता, विचारशक्ती आणि सर्जनशीलता अधिक सक्षम होते. मराठी माध्यम अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
मराठीची समृद्ध साहित्यपरंपरा तरुण पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज असल्याचे नमूद करत त्यांनी वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी विविध उपक्रम, पुस्तक प्रदर्शन, साहित्यिक संवाद आणि शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. मराठीचा दैनंदिन व्यवहारात अधिकाधिक वापर करून तिच्या अभिवृद्धीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमस्थळी मराठी साहित्याचे पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. साहित्यप्रेमींनी या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले. विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

