

शिर्डी : श्री साईबाबा संस्थान तर्फे श्रीरामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह विविध भागांतून पायी शिर्डीकडे येणाऱ्या साईभक्तांच्या पालखी सोहळ्यांचे नाशिक–सिन्नर रोडवर मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. संपूर्ण परिसर “साईराम”च्या गजराने दुमदुमून गेला होता.
संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी स्वतः उपस्थित राहून पालखी मंडळांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी पदयात्री साईभक्तांशी संवाद साधत त्यांच्या सोयी-सुविधांची विचारपूस केली. या स्नेहपूर्ण संवादामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही परंपरा जपत दोन्ही अधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्यासोबत काही अंतर पायी चालत भक्तिभावाचा अनुभव घेतला. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी स्वतः पदयात्रेत सहभागी होत असल्याने भाविकांमध्ये विशेष आनंद व उत्साह पाहायला मिळाला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर व त्यांच्या पत्नी सौ. वंदना गाडिलकर यांच्या हस्ते पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. पूजनानंतर साईभक्तांच्या सेवेसाठी संस्थान सदैव कटिबद्ध असल्याचा संदेश देण्यात आला. या प्रसंगी संस्थानचे विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने साईभक्त उपस्थित होते.
दरम्यान, यंदाच्या श्रीरामनवमी उत्सवात श्री साईबाबा संस्थान तर्फे पालखी पदयात्रेसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. मार्गावरील विविध ठिकाणी कीर्तन व प्रवचनांचे आयोजन करण्यात आले असून, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था, फिरती शौचालये, वैद्यकीय मदत तसेच इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सोयी-सुविधांमुळे हजारो पदयात्रींना मोठा दिलासा मिळत असून, त्यांच्या प्रवासात सुलभता निर्माण झाली आहे.
शिर्डीत दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या श्रीरामनवमी उत्सवाला देशभरातून लाखो भाविक उपस्थित राहतात. या पार्श्वभूमीवर संस्थानकडून करण्यात येणारे नियोजन, सेवा आणि स्वागत यामुळे साईभक्तांच्या श्रद्धेला अधिक बळ मिळत आहे.
या स्वागत सोहळ्यामुळे श्रद्धा, सेवा आणि समर्पणाची परंपरा अधिक दृढ होत असून, शिर्डीची ओळख केवळ तीर्थक्षेत्र म्हणूनच नव्हे तर सेवाभावी व्यवस्थापनाच्या आदर्श म्हणूनही अधिक अधोरेखित होत आहे.

