निळवंडे पाण्यासाठी गावागावांत अधिकाऱ्यांच्या बैठका घेणार :- खा सदाशिव लोखंडे

शिर्डी :दि १७
गेल्या ५३ वर्षांपासून वाट पाहत असलेल्या निळवंडे लाभधारक शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता पडू देणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन टीएमसी पाणी मागितले होते , तात्काळ त्यांनी रात्री साडेअकरा वाजता जलसंपदा विभागाचे सचिव यांना फोन करून आपल्याला पाणी वाढवण्याच्या सूचना दिल्या, आता प्रत्येक गावात पूर्ण क्षमतेने तसेच विनावादाचे पाणी मिळण्यासाठी अधिकारी व शेतकरी यांच्या बैठका लावण्यात येणार असून लाभक्षेत्राला पाणी दिले जाणार असल्याचे प्रतिपादन खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले .

शुक्रवारी निळवंडे डाव्या कालव्याचे शेतकरी व जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी शिर्डी विश्रामगृहात खा सदाशिव लोखंडे यांच्या सन्मानाचे आयोजन केले होते यावेळी ते बोलत होते . यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त खा लोखंडे यांच्या हस्ते अनेक शेतकऱ्यांनी विनम्र अभिवादन केले . पुढे बोलताना ते म्हणाले, मुंबई येथे मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी अनेक वेळा वाट पाहावी लागली परंतु शेवटी भेट घेण्यात आली व तात्काळ कार्यवाही सुरू झाली . निळवंडेच्या पहिल्या चाचणीत काही शेतकऱ्यांना पाणी मिळाले तर काही गावे वंचित राहिली होती आणि दुसरी चाचणी सुरू झाली परंतु प्रत्येक गावाला पाणी मिळाले नाही, त्यामुळे आता पाण्याची क्षमता वाढवण्यात आली असून आता प्रत्येक गावाला पाणी मिळणार आहे, परंतु वादविवाद न घालता आता प्रत्येकाला पाण्याचा वाटा मिळण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येणार आहे . त्यामुळे गावातील तलाव, बंधारे, ओढे तसेच शेततलाव तुडुंब भरू दिले जाणार आहे . त्यामुळे आता शेतकऱ्यांनी चिंता करू नये .
यावेळी जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, भाजप जिल्हा सरचिटणीस नितीन कापसे, बाजीराव दराडे,निळवंडे समीतीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, उत्तम घोरपडे, विठ्ठल घोरपडे, राजू सोनवणे सदाशिव गोंदकर, प्रकाश चित्ते यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते
मुख्यमंत्री यांची भेट घेऊन निळवंडेचा प्रश्न सुटला असून दीड टीमसी पाणी सोडले जाणार आहे . आता निळवंडे नंतर दुसरा संघर्ष आपल्याला करायचा असून त्यामध्ये घाटमाथ्याचे पाणी वळविण्याचे काम आहे, येथे माझी जागा सध्या आरक्षित असली तरी तुमची शेती कायमची आहे त्यामुळे या भागाला पाणी कधी कमी पडू दिले जाणार नाही . त्यासाठी आपल्याला घाटमाथ्याचे काम करायचे आहे .
—-खा सदाशिव लोखंडे, शिर्डी