
शिर्डी (प्रतिनिधी) कोल्हार-घोटी या महामार्गावर कोकणगाव जवळ हॉटेल भाग्यलक्ष्मी समोर रविवारी सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. स्लीपर कोच ट्रॅव्हल बस आणि आंब्याने भरलेला मालवाहू ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला असून या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला,

तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि मदत व बचाव कार्य सुरु केले.जखमींना तत्काळ संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या अपघातामुळे कोल्हार-घोटी मार्गावर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस तपास सुरु असून अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. दरम्यान मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार एम एच 46 सी यु 27 54 क्रमांकाची स्लीपर कोच ट्रॅव्हल्स संगमनेरहुन शिर्डी आणि शनिशिंगणापूर कडे भाविकांना घेऊन जात होती .
त्यात मोठ्या संख्येने भाविक होते. कोकणगाव परिसरात असताना समोरून लोणीच्या दिशेने एम एच बारा एन एक्स 14 54 क्रमांकाचा आंब्याने भरलेला माल ट्रक भरधाव वेगाने येत होता. दोन्ही वाहन चालकांना वेगावर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली.या धडके नंतर दोन्ही वाहने रस्त्याखाली फेकली गेली.
ट्रक चालकाचा सहाय्यक जागीच ठार झाला तर ट्रक मध्ये प्रवासी नसल्याने मोठी जीवित हानी टळली. अपघातातील दोन्ही वाहनांचे व आंब्याचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे . या दुर्दैवी अपघातात प्रवीण सोपान कांदळकर, सुकेवाडी तालुका संगमनेर फिरोज लाला शेख कासार दुमाला तालुका संगमनेर आणि अंजू प्रवीण वाल्मिकी पानिपत हरियाणा या तिघांचा मृत्यू झाला असल्याचे समजते.
दरम्यान या अपघातातील सर्व जखमींवर संगमनेर येथे दवाखान्यात उपचार सुरू आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.