
शिर्डी | प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा कट्टर, एकनिष्ठ व निस्वार्थ शिवसैनिक, शिर्डी शहर शिवसेनेची शान आणि अभिमान असलेले श्री. सुनीलभाऊ परदेशी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने परदेशी कुटुंबीय, सगेसोयरे, शिवसेना मित्रपरिवार व नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शिर्डी ही त्यांची कर्मभूमी होती. बालवयातच समाजसेवेचे व्रत स्वीकारत कट्टर हिंदुत्ववादी विचारांची मशाल हातात घेतलेले सुनीलभाऊ सुरुवातीच्या काळात माजी खासदार स्व. भिमराव बडदे यांच्या नेतृत्वाखाली पतितपावन संघटनेतून समाजकार्याला सुरुवात केली. पुढे वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी शिवसेनेत आपले आयुष्य झोकून दिले.
संघर्षातून उभा राहिलेला लढवय्या शिवसैनिक
शिवसेनेचे कार्य करत असताना कौटुंबिक, आर्थिक व राजकीय अनेक संकटांवर मात करत त्यांनी कधीही आपली निष्ठा ढळू दिली नाही. अतिक्रमण कारवाईत त्यांचे फुल, प्रसाद, शाल व श्रीफळाचे दुकान गेले; मात्र त्यांनी हार मानली नाही.
चावडीसमोर पहाटे साईबाबांची आरती झाल्यानंतर नारळ विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत, येणाऱ्या भाविक भक्तांची आणि शिवसैनिकांची निस्वार्थ सेवा त्यांनी अखेरपर्यंत सुरू ठेवली.
तन–मन–धनाने शिवसेना
स्वखर्चाने, तन–मन–धन अर्पण करून खांद्यावर भगवा झेंडा घेऊन, शिर्डी शहरातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत खांद्याला खांदा लावून त्यांनी पक्षकार्य केले. त्यांचा मित्रपरिवार मोठा होता; कारण ते माणुसकी, स्वाभिमान आणि निष्ठेचे जिवंत उदाहरण होते.
साईभक्त आणि मातोश्रीवर अढळ श्रद्धा
ते शिर्डी साईबाबांचे निस्सीम भक्त होते. साईबाबांवर जितकी श्रद्धा, तितकीच निष्ठा मातोश्रीवर आणि शिवसेना नेतृत्वावर होती.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांचे ते खंदे समर्थक होते. अलीकडेच डोम मैदानावर झालेल्या ऐतिहासिक मराठी मोर्चात सहभागी होत, उद्धवसाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांच्या युतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले होते.
हाकेला ‘ओ’ देणारा शिवसैनिक
गेली २५–३० वर्षे मुंबईतील दसरा मेळावा, शिवसेना वर्धापन दिन, मोर्चे, बैठका — एकही कार्यक्रम त्यांनी चुकवला नाही.
शिर्डीत आलेल्या प्रत्येक शिवसैनिकाचे शिवबंधन पाहून ‘जय महाराष्ट्र’ म्हणत चहा-पाणी, नाश्ता केल्याशिवाय ते कोणालाही जाऊ देत नसत.
“हे माझं नाही, साईबाबांचा प्रसाद आहे” असे ते नेहमी सांगत.
कधीही न भरून येणारी पोकळी
आज त्यांच्या स्मृतींना उजाळा देताना डोळ्यांत अश्रू तरळतात.
जन्म-मृत्यू अटळ असला तरी माणूस कसा जगला, हेच महत्त्वाचे ठरते — आणि सुनीलभाऊ परदेशी यांनी आयुष्यभर शिवसेनेसाठी, समाजासाठी आणि माणसांसाठी जगून दाखवले.
त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून न येणारी आहे.
त्यांच्या दशक्रिया विधीनिमित्त योगीराज चांगदेव महाराज व साईबाबा चरणी त्यांच्या पवित्र आत्म्यास सद्गती व चिरशांती लाभो, अशी मनःपूर्वक प्रार्थना करण्यात येत आहे.
🌹 भावपूर्ण श्रद्धांजली | अखेरचा भगवा सलाम 🌹
💐🚩 शोकाकुल परिवार 🚩💐
दैनिक साईदर्शन परिवार, शिर्डी

