राष्ट्रीय लोक अदालती मध्ये तडजोडीने प्रकरण मिटवण्याचे आवाहन न्यायाधीश यार्लगड्डा
अहमदनगर जिल्ह्यात दिनांक २७ जुलै २०२४ रोजी लोकअदालतीचे आयोजन
आपापसातील वाद समझोत्याने मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन शनिवार 27 जुलै 2024 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात करण्यात आलेले आहे. या राष्ट्रीय लोकअदलातीमध्ये मोटार वाहन अपघात प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, वीज वितरण कंपनीचे प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, फौजदारी प्रक्रिया संहितेतील तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे जसे की चोरीची प्रकरणे, किरकोळ मारहाणीची प्रकरणे, चेक बाऊन्सची प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे तसेच बँक व वीज वितरण कंपनीचे दाखल पूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय व ग्राहक तक्रार निवारण मंचाचे प्रकरणे लोक अदालतमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आलेले आहेत.
लोक अदालतीमध्ये प्रकरण मिटवल्यास कोर्ट फी परत मिळते. ज्या नागरिकांना आपली प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायचे असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा अहमदनगर न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा. तसेच आपले प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायची असल्यास आपण खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता.
संपर्क क्रमांक 8591 903616 तसेच dlsanagar@gmail.com यावर ईमेल करू शकता- लोकन्यायालयामध्ये प्रकरण ठेवण्यासाठी प्रलंबित प्रकरणांमध्ये पक्षकार त्यांच्या वकिलांशी देखील संपर्क साधू शकता.
राष्ट्रीय लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर यांनी केले आहे.