जमिनीच्या वादातून पुण्यात तरुणीला जमिनीत गाडले गुन्हा दाखल
पुण्याच्या राजगड कोंढवळे गावात जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींविरोधात 307 कलमअंतर्गंत गुन्हा दाखल केला आहे.
संभाजी खोपडे, तानाजी खोपडे, बाळू भोरकर, उमेश जयस्वाल या चार जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न, शिवीगाळ धमकावणे यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंढवळे गावात जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संबंधीत तरुणीने आणि तिच्या आईने केला होता. ट्रॅक्टर आणि जेसीबी घेऊन दावा न्यायप्रविष्ट असलेल्या जमिनीचा बेकायदेशीर पध्दतीने ताबा घेण्यासाठी आलेल्या 25 ते 30 जणांनी जेसीबीच्या सहाय्याने अंगावर माती टाकून तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिनी आणि तिच्या घरच्यांनी केला आहे.या प्रकरणी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
धक्कादायक म्हणजे, जमिनीचा ताबा घेण्यासाठी मुंबईवरुन गुंड मागवल्याचाही प्रकार समोर आला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात वापरण्यात आलेल्या ट्रॅक्टर आणि जेसीबीदेखील जप्त करण्यात आले आहेत.