
शिर्डी (प्रतिनिधी) देशातच नव्हे तर देशाबाहेरही आपला विश्वास बसणार नाही इतके साईबाबांचे भक्त आहेत. आपण क्रिकेटच्या निमित्ताने अनेक देशात जातो वेस्टइंडीज ,इंग्लंड ऑस्ट्रेलिया आदी सर्वच सर्व देशांमध्ये श्री साईबाबांना मानणारे खूप मोठ्या संख्येने साईभक्त आहेत. दिवसेंदिवस साईबाबांची महती वाढतच आहे. असे मत प्रसिद्ध क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

प्रसिद्ध उद्योगपती गौतम सिंघानिया व माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी गुरुवार 10 एप्रिल 2025 रोजी सकाळी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साईदर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी उप मुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध क्रिकेटपटू रवी शास्त्री माध्यमांशी बोलताना म्हणाले की,
आपण गेल्या 40 वर्षापासून शिर्डीला साई दर्शनासाठी येत असतो. येथे आल्यानंतर साईबाबांचे दर्शनच महत्त्वाचे आहे. क्रिकेट सेकंडरी आहे. गेल्या 40 वर्षांमध्ये येथे मोठा बदल झाला आहे. दररोज साठ हजार साई भक्त येथे येतात असे समजले. येथे नेहमी गर्दी असते. देशाप्रमाणे परदेशातही आपण क्रिकेटच्या निमित्ताने जात असतो तेथेही मोठ्या संख्येने साईभक्त आहेत.
असे सांगत पूर्वीचे क्रिकेट व आताचे क्रिकेट यात खूप बदल झाल्याचे विचारताच सर्व काही बदलत असते. क्रिकेटही बदलत आहे. क्रिकेट बदलणार , क्रिकेटचा खेळ बदलणार, क्रिकेटचे खेळाडू बदलणार !मात्र साईबाबांचे दर्शन व मिळणारी शांती ही चिरकाल तसच राहणार, असं सांगितलं .