अहिल्यानगर, दि. १५ : देशाच्या सीमेवर अहोरात्र लढणाऱ्या आणि राष्ट्ररक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व ब्रिगेडिअर रोहित मेहता यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कर्नल प्रसाद मिजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वॉड्रन लीडर विद्यासागर कोरडे (निवृत्त) आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, देशाच्या संरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. शहीद, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना सन्मानाने व सुरक्षिततेने जीवन जगता यावे, त्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात आणि समस्या वेळेत सोडविता याव्यात यासाठी ध्वजदिन निधी संकलन अत्यंत महत्त्वाचे आहे. हा निधी केवळ आर्थिक मदत नसून सैनिकांच्या त्यागाला दिलेला सन्मानाचा सलाम आहे.
ध्वजदिन निधीच्या माध्यमातून शहीद व माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य, पुनर्वसन, शिक्षण, वैद्यकीय उपचार व सामाजिक सुरक्षितता प्रदान केली जाते. मागील दोन वर्षांपासून अहिल्यानगर जिल्हा राज्यात निधी संकलनामध्ये अग्रस्थानी असून, हे सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षीही दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक निधी संकलित करून जिल्ह्याची ही गौरवशाली परंपरा कायम राखावी, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ब्रिगेडिअर रोहित मेहता यांनी सांगितले की, सैन्यात दाखल होणारा जवान केवळ नोकरी स्वीकारत नाही, तर तो देशसेवेचा पवित्र वसा घेतो. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात भाषा, धर्म, जात-पंथ यांपलीकडे जाऊन ‘देश प्रथम’ या एकाच ध्येयाने सैनिक खांद्याला खांदा लावून लढतात. सीमारेषेवर उभा असलेला सैनिक हा देशाच्या स्वातंत्र्याचा, सार्वभौमत्वाचा आणि अखंडतेचा खरा रक्षक असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविकात स्क्वॉड्रन लीडर विद्यासागर कोरडे (निवृत्त) यांनी सांगितले की, शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या अडीअडचणी दूर करणे, अपंगत्व आलेल्या व सेवानिवृत्त जवानांचे पुनर्वसन करणे तसेच नव्या पिढीत राष्ट्रप्रेमाची भावना रुजवणे, हा ध्वजदिन निधी संकलनाचा मुख्य उद्देश आहे. गतवर्षी ४ कोटी ७५ लक्ष रुपयांचा विक्रमी निधी संकलित करून जिल्हा राज्यात अग्रस्थानी ठरला असून, राज्यपालांच्या हस्ते जिल्ह्याचा गौरव करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक कामगिरीबद्दल विशेष पुरस्कार देण्यात आले. तसेच निधी संकलनामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध शासकीय कार्यालय प्रमुखांचा व सामाजिक संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले तर आभार कल्याण संघटक चंद्रकांत शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, माजी सैनिक, माजी सैनिकांचे कुटुंबीय, वीरपत्नी, वीरमाता व वीरपिता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

