
राहाता (प्रतिनिधी) – “दरमहा १० ते १५ टक्के हमखास परतावा” अशा गोड बोलांनी सर्वसामान्यांची कोट्यवधींची लूट करणाऱ्या ‘ग्रो मोअर’ टोळीचा मुखवटा सर्वप्रथम दैनिक साईदर्शनने फाडला होता. आता त्याच प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल ५०० पानी पुरवणी दोषारोपपत्र एमपीआयडी विशेष न्यायालयात दाखल करून घोटाळ्याची व्याप्ती अधिकृतपणे उघड केली आहे.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार भूपेंद्र राजाराम सावळे (रा. श्रीकृष्णनगर, शिर्डी) याच्याविरुद्ध यापूर्वीच दोषारोपपत्र दाखल झाले आहे. त्याचे साथीदार संदीप भास्कर (रा. सावळे श्रीकृष्णनगर, शिर्डी) व सुबोध सुकदेव पाटील (रा. साईप्रसादनगर, शिर्डी) यांच्याविरुद्ध आता सुमारे ५०० पानी भक्कम पुराव्यांसह पुरवणी दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
💸 ७२३ कोटींचा संशयित व्यवहार; जिल्ह्यात खळबळ
‘मनीटेल’च्या प्राथमिक अहवालानुसार या संपूर्ण रॅकेटमधून तब्बल ७२३ कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अंतिम अहवाल अद्याप प्रलंबित असला तरी या आकड्यामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
‘ग्रो मोअर’ या नावाखाली अनेक कंपन्या स्थापन करून कोणतीही अधिकृत आर्थिक परवानगी न घेता कोट्यवधींची बेकायदेशीर वसुली केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना परतावा देऊन विश्वास संपादन करण्यात आला आणि नंतर मोठ्या रकमा गोळा करून हात वर केल्याचा आरोप आहे.
🔍 आणखी आरोपी रडारवर; अटक होणार का?
या घोटाळ्यात राजाराम भटू सावळे, पूजा गोकुळ पोटडे, भाऊसाहेब आनंदराव थोरात, अरुण रामदास नंदन आणि सीमा अरुण नंदन यांचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांचा शोध सुरू असून अटक झाल्यानंतर पुन्हा पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेने सखोल तपास करून गुंतवणूकदारांचे जबाब, बँक व्यवहार, कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे गोळा केले आहेत.
⚠️ “जादा परतावा”चे आमिष – जनतेला सावध राहण्याचे आवाहन
दरमहा १० ते १५ टक्के हमखास परतावा देण्याचे आश्वासन म्हणजेच फसवणुकीची घंटा, हे या प्रकरणातून पुन्हा अधोरेखित झाले आहे. दैनिक साईदर्शनने सुरुवातीपासूनच या घोटाळ्याची ठिणगी दाखवून जनतेला सावध केले होते. आज त्याच बातमीवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.
👉 आता प्रश्न एकच – उर्वरित आरोपी केव्हा जेरबंद होणार? आणि कोट्यवधी गमावलेल्या गुंतवणूकदारांना न्याय कधी मिळणार?
जिल्ह्याचे लक्ष या प्रकरणाकडे खिळले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
साई के नगरी में देर है, अंधेर नहीं
शिर्डीसह राज्यभरातील ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या ठकसेन साळवे कुटुंबियांनी “कोणी काही करू शकत नाही” असा गर्व केला. दरमहा जादा परताव्याचे आमिष दाखवून सर्वसामान्यांची आयुष्यभराची कमाई लाटली आणि पैसे घेऊन पसार होण्याचा डाव आखला.
परंतु ही साईंची नगरी… इथे अन्याय कितीही मोठा असला तरी न्याय उशिरा का होईना, मिळतोच!
मुख्य सूत्रधार भूपेंद्र उर्फ ‘भूप्या’ साळवे याचा गर्व चूर झाला आणि अखेर त्याला तुरुंगवास भोगावा लागला. बाबांचा दांडा फिरला आणि ठकसेनांच्या साम्राज्यावर गदा कोसळली.
ठेवीदारांच्या अश्रूंना न्याय मिळवून देण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असून उर्वरित आरोपींवरही कारवाईची तलवार लटकत आहे.
संदेश एकच — साई नगरीत फसवणूक करून कोणीही सुटत नाही!
╚══════════════════════════════════════════╝

