
शिर्डी | प्रतिनिधी | दि. १६
आगामी नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर शिर्डीत लाखो भाविक दाखल होणार असल्याने, त्यांच्या सोयीसाठी सुरू असलेली सर्व विकासकामे निर्धारित वेळेत आणि कुंभमेळ्यापूर्वीच पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट निर्देश नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले.
शिर्डी-शिंगणापूर परिसरातील भाविकांच्या गर्दी व्यवस्थापनासंदर्भात साईबाबा मंदिर सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भाविकांच्या सोयींना प्राधान्य, प्रशासनाच्या नव्हे!
डॉ. गेडाम म्हणाले की, “गर्दी व्यवस्थापन करताना प्रशासकीय सोयीपेक्षा भाविकांच्या सुविधा केंद्रस्थानी असल्या पाहिजेत.”
शिर्डी विमानतळ विस्तारीकरणाच्या कामांना गती देऊन पुढील सहा महिन्यांत ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच रस्ते विकासकामे दर्जेदार असावीत, यासाठी स्वतः प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्रुटी आढळल्यास संबंधित कामे पुन्हा करण्याचे आदेश दिले जातील, असा इशाराही त्यांनी दिला.
रेल्वे व वाहतूक व्यवस्थेसाठी ‘कोपरगाव पॅटर्न’
शिर्डी हे रेल्वे टर्मिनस असल्याने निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी ‘कोपरगाव पॅटर्न’ राबविण्याचे निर्देश देण्यात आले.
लांब पल्ल्याच्या गाड्यांना कोपरगाव येथे थांबा देऊन, तेथून एस.टी. बसद्वारे भाविकांना शिर्डीत आणण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
शिर्डी–राहाता बायपासचा दर्जा उच्च प्रतीचा ठेवण्यावर भर देत, नगर–मनमाड महामार्गाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने करावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
शिर्डी–त्र्यंबकेश्वर थेट बस सेवा, वाहतूक कोंडीवर उपाय
नाशिकमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि भाविकांचा वेळ वाचवण्यासाठी शिर्डी ते त्र्यंबकेश्वर थेट बस सेवा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.
जड वाहनांमुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी मनमाडकडील वाहने येवला–वैजापूर–गंगापूर–नेवासा–अहिल्यानगर मार्गे वळवण्यात येणार आहेत.
एस.टी. महामंडळाने पर्वणी काळात दररोज ६८० फेऱ्यांचे नियोजन केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
स्वच्छता, पाणी व वीज पुरवठ्यावर विशेष भर
पार्किंग परिसरातील कचरा उचलण्यासाठी घंटागाड्यांऐवजी ट्रॅक्टरचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले.
स्वच्छतेसाठी ५०० अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून न राहता निळवंडे कालव्यावरून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
अखंडित वीजपुरवठ्यासाठी बाभळेश्वर येथून पर्यायी वीज लाईन टाकण्याचे निर्देशही देण्यात आले.
डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे गर्दी नियंत्रण
कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी गर्दी नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचे सांगितले.
शिर्डीच्या १५ किलोमीटर आधीपासून मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांतील दिशादर्शक फलक, पार्किंग उपलब्धतेसाठी डिजिटल स्क्रीन्स, संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही व पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम उभारण्यात येणार आहे.
कुंभमेळा काळात मोबाईल नेटवर्क सुरळीत ठेवण्यासाठी १४ नवीन मोबाईल टॉवर्स व ५ फिरते टॉवर्स उभारण्यात येणार असून, अग्निशमन सेवेसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाचा प्रस्ताव नाशिकच्या एकत्रित आराखड्यात समाविष्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक
या बैठकीस महसूल, जिल्हा परिषद, साईबाबा संस्थान, शिर्डी नगरपरिषद, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, शिर्डी विमानतळ प्रशासन, रेल्वे, एस.टी. महामंडळ व महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.

