शिर्डी प्रतिनिधी
शिर्डी येथिल दुहेरी हत्याकांडातील आरोपी यांनी तुरुंगाच्या खिडकीचे गज कापून पळून जात असताना त्यांना मंचर पोलीस स्टेशन हद्दीत पकडण्यासाठी आलेल्या शिर्डी आणि मंचर पोलिसांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील चार आरोपीना येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. वी एस. सय्यद यांनी १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आज (दि.३) रोजी ठोठावली. विनोद सुभाष जाधव वय (४१), आबासाहेब बाबासाहेब लांडगे वय (४०) दोघेही राहता जिल्हा अहमदनगर, सलीम उर्फ पाप्या ख्याजा शेख (वय ४६) सागर शिवाजी काळे (वय ३१), दोघेही राहणार कालिकानगर शिर्डी जिल्हा अहमदनगर असे शिक्षा झालेल्या सराईत आरोपींची नावे आहेत.
हे शिर्डी येथील पाटणी व गोदकर या दोन तरुणांच्या सामुहिक निर्घृण खुनातील आरोपी आहेत शिर्डी पोलीस ठाण्यांतर्गत खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेले विनोद सुभाष जाधव(४१), आबासाहेब बाबासाहेब लांडगे वय (४०) सलीम उर्फ पाप्या ख्याजा शेख (वय ४६), सागर शिवाजी काळे (वय ३१), हे पोलीस कस्टडीत असताना दि २८ एप्रिल २०१४ रोजी रात्री खिडकीचे गज कापून फरार झाले होते. गुप्त खबऱ्याच्या माहिती नुसार ते मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे शिर्डी पोलिसांना माहिती मिळाली होती त्यानुसार शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस या आरोपीना पकडण्यासाठी मंचर पोलीस स्टेशन हद्दीत आले होते. शिर्डी पोलीस व मंचर पोलीस यांनी या आरोपींचा मागोवा काढला. दि १ मे २०१४ रोजी हे चार आरोपी गावडेवाडी – वाफगाव रस्त्याने पोलिसांना गुंगारा देत पळून जात होते.
त्यांना पोलिसांनी शरण येण्यास सांगितले मात्र ते पळून जाऊ लागले. त्यावेळी त्यांना पकडण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला मात्र ते दुचाकी (क्र एम एच १७ ए एच ७३१९) वरून पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी दुचाकी पोलिसांच्या अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.या चारही सराईत आरोपींनी पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले होते. मात्र पोलिसानी त्यांना पकडले व अटक केली. आरोपी सलीम उर्फ पाप्या ख्याजा शेख यांच्याकडून एक गावठी कट्टा आणि २ जिवंत काडतुसे हस्तगत केली.
शिर्डी पोलीस ठाण्याचे जखमी पोलीस निरीक्षक संपत भोसले यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न (भादंवि ३०७) सरकारी कामात अडथळा (३५३) सह ३३३, ३३६ व आर्म अॅक्ट ३ (२५) अनव्ये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपस मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन जाधव यांनी केला. हा खटला राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरु होता. त्याचा निकाल आज मुख्य न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी दिला. सरकारी पक्षाच्या वतीने सहायक अभियोक्ता मिलिंद पांडकर यांनी
आरोपींचा पूर्व इतिहास पाहता ते गुन्हगारी क्षेत्रातील असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी असा युक्तिवाद केला. प्रत्यक्षदर्शी पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी याची साक्ष महत्वाची ठरली. न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी आरोपी विनोद सुभाष जाधव वय (४१), आबासाहेब बाबासाहेब लांडगे वय (४०) दोघेही राहता जिल्हा अहमदनगर, सलीम उर्फ पाप्या ख्याजा शेख (वय ४६), सागर शिवाजी काळे (वय ३१), दोघेही राहणार कालिकानगर शिर्डी जिल्हा अहमदनगर यांना भादंवि कलम ३०७ अनव्ये १० वर्षे सश्रम कारावास, भादंवि कलम ३५३ अनव्ये १ वर्षे सश्रम कारावास, भादंवि कलम ३३३ अनव्ये ७ वर्षे सश्रम कारावास, भादंवि कलम ३३६ अनव्ये १ महिना सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली. या खटल्याचे न्यायालयातील पोलीस कामकाज महिला पोलीस हवालदार सुनीता बटवाल यांनी पाहिले