
शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डीसारख्या जागतिक कीर्तीच्या धार्मिक स्थळी गुंडगिरीचा कळस गाठणारी धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. कामाच्या शोधात आलेल्या एका तरुणावर केवळ पेरूच्या टोपलीला चुकून पाय लागल्याच्या किरकोळ कारणावरून निर्घृण हल्ला करण्यात आला. संतप्त आरोपींनी थेट लाकडी फळीने डोक्यात वार करत त्याला रक्तबंबाळ केले, तर इतरांनी लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंड राज्यातील बागेश्वर जिल्ह्यातील राजेंद्रसिंग आनसिंग रावत (वय 35) हा तरुण मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात हॉटेलमध्ये काम करत होता. नुकताच तो शिर्डीत नोकरीच्या शोधात आला होता. मंगळवारी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास तो द्वारकामाईकडून गेट क्रमांक 2 कडे जात असताना रस्त्यावर फेरीवाल्यांची प्रचंड गर्दी होती.
यावेळी गर्दीतून वाट काढताना त्याचा पाय चुकून एका पेरू विक्रेत्याच्या टोपलीला लागला आणि पेरू खाली सांडले. या क्षुल्लक प्रकारावरून आरोपींनी संतापाचा स्फोट करत त्याच्यावर शिवीगाळ सुरू केली. तरुणाने वारंवार माफी मागूनही आरोपी शांत झाले नाहीत.
उलट, संतापाच्या भरात मुस्कान शेख हिने रस्त्यावर पडलेली लाकडी फळी उचलून थेट तरुणाच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या हल्ल्याने तो जागीच कोसळला आणि डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर फरिदा शेख आणि सोहेल शेख यांनी त्याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करत दादागिरीचा कळस गाठला.
भरदिवसा, लोकांसमोर उघडपणे झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करत जखमी तरुणाला अॅम्बुलन्सद्वारे रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्या डोक्याला तब्बल आठ टाके पडल्याचे स्पष्ट केले असून प्रकृती चिंताजनक नसल्याची माहिती आहे.
या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0214/2026 नोंद करण्यात आला असून मुस्कान शेख, फरिदा शेख आणि सोहेल शेख (सर्व रा. शिर्डी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 118(2), 115(2), 352 व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
⚠️ शिर्डीत कायद्याचा धाक संपला का?
किरकोळ कारणावरून थेट जीवघेणा हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब असून शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
🔥 माफी मागूनही मारहाण — दादागिरीचा कळस
पीडित तरुणाने चूक मान्य करून माफी मागूनही आरोपींनी अमानुष मारहाण केल्याने ही घटना केवळ वाद नसून सरळ गुंडगिरी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
🛑 प्रशासनाने आता तरी जागे व्हावे!
अशा घटनांमुळे शहराची प्रतिमा मलिन होत असून प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करून फेरीवाल्यांवर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

