
अहिल्यानगर :
नगर–मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून जिल्ह्यातील राजकारण स्फोटक वळणावर पोहोचले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्यावर खासदार निलेश लंके यांनी प्रचंड संताप व्यक्त करत सत्ताधाऱ्यांवर थेट, गंभीर आणि धक्कादायक आरोपांची सरबत्ती केली आहे. “शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी हात ठेवून सांगा – पैसे कुणी मागितले?” असा थेट सवाल करत लंके यांनी सत्तेतील लोकांची पुरती कोंडी केली आहे.
सात ते आठ वर्षे नगर–मनमाड महामार्गाचे काम रखडलेले असताना अनेक ठेकेदार काम अर्धवट सोडून का पळाले? हा प्रश्न लंके यांनी समाजासमोर मांडला. “कुणाला वैतागून गेले? कुणी काय मागणी केली? दबाव होता की लाच?” असे थेट प्रश्न विचारत त्यांनी प्रशासन आणि राजकीय नेतृत्वावर संशयाची सुई रोखली.
“एवढ्या वर्षांत एकही पालकमंत्री नागरिकांना सरळ उत्तर देऊ शकला नाही. ठेकेदार गेले, रस्ता राहिला खड्ड्यांत, आणि जनतेचे जीव गेले. याला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल करत लंके यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.
आपल्या कार्यकाळाबाबत बोलताना लंके म्हणाले, “मी खासदार झाल्यानंतर पुन्हा टेंडर काढले, काम सुरू केले. त्रुटी होत्या म्हणून काम थांबले, पण पुन्हा टेंडर काढून आता प्रत्यक्ष काम सुरू आहे. हे काम माझ्याच काळात पूर्ण होणार आहे – हे मी ठामपणे सांगतो.”
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा उल्लेख करत लंके यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारे विधान केले. “नितीन गडकरी यांनी नगरच्या काही राजकीय नेत्यांबाबत माझ्यासमोर जे सांगितले आहे, ते जर मी उघड केलं तर अनेकांच्या खुर्च्या हादरतील,” असा इशारा देत त्यांनी सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण केली.
“तुम्ही एवढे कार्यक्षम होता, तर तुमच्या काळात हा महामार्ग मंजूर का झाला नाही? सात–आठ वर्षे जनतेला खड्ड्यांतून चालायला लावणाऱ्यांनी आज जाब द्यावा,” असे म्हणत लंके यांनी पालकमंत्री विखे पाटील यांना थेट आव्हान दिले.
नगर–मनमाड महामार्गाच्या प्रश्नावरून आता लाच, दबाव, ठेकेदार पळवणूक आणि राजकीय संरक्षण असे गंभीर मुद्दे समोर येत असून, “साईबाबांच्या चरणी हात ठेवून सांगा – पैसे कुणी मागितले?” हा एकच प्रश्न सत्ताधाऱ्यांच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण करत आहे.

