शिर्डी : शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह जनतेच्या मनात खोलवर रुजलेले असताना ते गोठवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध ठाकरे गट संघर्षाला धार आली आहे. वकील कपिल सिब्बल यांच्या माध्यमातून ठाकरेंच्या मनातील खरी इच्छा जगासमोर आली आहे, असा थेट आणि बोचरा हल्ला शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साईबाबांची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला. दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना श्रीकांत शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर जोरदार निशाणा साधला.
‘धनुष्यबाण गोठवण्याची मागणी म्हणजे ठाकरेंच्या मनातील सत्य उघड’
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केल्याच्या मुद्द्यावर श्रीकांत शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली. धनुष्यबाण हे केवळ निवडणूक चिन्ह नसून गेल्या अनेक वर्षांपासून ते शिवसेनेची ओळख बनले आहे. लाखो-करोडो शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या भावना या चिन्हाशी जोडलेल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
“कपिल सिब्बल यांच्या माध्यमातून ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे, हे आज जगासमोर आलं आहे,” असा टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला.
‘शिवसेनेशी नव्हे, फक्त राजकीय स्वार्थाशी देणे-घेणे!’
ठाकरेंना शिवसेना किंवा धनुष्यबाण चिन्हाशी आता काहीही देणे-घेणे राहिलेले नाही. त्यांना केवळ राजकारण आणि राजकीय स्वार्थ साधायचा आहे, असा आरोपही श्रीकांत शिंदे यांनी केला.
“जे त्यांच्या पोटात होतं, तेच आज ओठावर आलं. कपिल सिब्बल यांच्या माध्यमातून त्यांच्या मनातील खरी इच्छा बाहेर आली,” अशा शब्दांत त्यांनी ठाकरे गटावर घणाघात केला.
संजय राऊतांवर बोलणे टाळले; ‘हे पवित्र ठिकाण आहे’
संजय राऊत यांच्या राजकीय वक्तव्यांबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता श्रीकांत शिंदे यांनी त्यावर भाष्य करणे टाळले. “आपण सध्या पवित्र आणि चांगल्या ठिकाणी उभे आहोत,” असे म्हणत त्यांनी अन्य राजकीय विषयांवर अधिक बोलण्यास नकार दिला.
शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेऊन बाहेर पडलेल्या श्रीकांत शिंदे यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे शिवसेना विरुद्ध ठाकरे गटातील राजकीय संघर्षाला पुन्हा एकदा नवी धार मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.