साईबाबा संस्थानच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना साईबाबांच्या द्वारकामाईतील पवित्र शिळेजवळ सापडलेलं सोन्याचं घड्याळ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ज्या भाविकाचं हे घड्याळ आहे त्यानं ते घेऊन जावं, असं आवाहन साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आलं आहे. तर, दुसरीकडे या घड्याळाचा लिलाव संस्थाननं करावा, अशी मागणी काही ग्रामस्थ करत आहेत. मात्र, संस्थान या घड्याळाचा लिलाव करणार नसल्याचं साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी बोलताना स्पष्ट केलं आहे.
घड्याळाचा लिलाव करावा अशी मागणी : साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातील हजारो भाविक दररोज शिर्डीत येतात. साईबाबांच्या समाधी दर्शनानंतर बाबांनी आपलं संपूर्ण जीवन फकीर अवस्थेत व्यतीत केलेल्या द्वारकामाईतही भाविक दर्शनासाठी जातात.
साईबाबा आपल्या हयातीत जिथं बसायचे त्या द्वारकामाईतील पवित्र शिळेजवळ 21 मेला साई संस्थानच्या महिला सुरक्षा रक्षक रंजना कुंभार आणि रशीद शेख यांना दोन लाख रुपयांचे सोन्याचं घड्याळ सापडलं. या घड्याळ्याच्या डायलवर ब्रिटनच्या महाराणी व्हिक्टोरियाची प्रतिमा आणि Victoria Empress असं लिहिलेलं असल्यानं सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आपल्या सुरक्षा अधिकाऱ्याकडं जमा केलं.
घड्याळ जमा केल्यापासूनच साई संस्थानच्या वतीनं ज्या भाविकाचे घड्याळ आहे त्या भाविकानं आपली ओळख पटवून ते घेऊन जाण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, 10 दिवस उलटूनही घड्याळ घेण्यासाठी कोणी येत नसल्यानं संस्थानने या घड्याळाचा लिलाव संस्थाननं करावा, अशी मागणी सध्या सोशल मीडियावर होत आहे.
साईबाबांच्या द्वारकामाईत सापडलेल्या या घड्याळाचा लिलाव करण्यात येणार नाही. आम्ही भाविकाची आणखी 8 ते 10 दिवस वाट पाहणार आहोत. जर भाविक आला नाही तर ते घड्याळ संस्थानच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवलं जाईल. भविष्यात तो भाविक कधीही आला तर ओळख पटवून दिल्यानंतर त्याला ते घड्याळ परत देण्यात येईल. मंदिर आणि परिसरात भाविकांच्या मौल्यवान वस्तू सापडल्यास त्या संस्थानकडं जमा केल्या जातात.
संस्थानच्या वतीने ज्या भाविकांच्या वस्तू असतात त्या त्यांनी घेऊन जाण्याचं आवाहन केलं जातं. परंतु, जर कोणीच पुढं आलं नाही तर, अशा वस्तू संस्थानच्या लॉकरमध्ये ठेवल्या जातात. संस्थानकडून मंदिर परिसरात सापडलेल्या वस्तूंचा लिलाव केला जात नाही. मात्र, देणगी कार्यालयात आणि हुंडीत टाकलेल्या वस्तूंचा लिलाव केला जातो.
कारण त्या भाविकांनी साईबाबांना देणगी म्हणून अर्पण केलेल्या असतात,” असं साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी बोलताना स्पष्ट केलं.