
शिर्डी | प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिर्डी शहराची कन्या भाग्यश्री सुजीत जोगंस (गुरव) यांनी भाजपच्या उमेदवारीवर प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत नगरसेविका म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या दणदणीत यशामुळे शिर्डी शहरात तसेच गुरव समाजात समाधान व आनंदाचे वातावरण पसरले आहे.

भाग्यश्री जोगंस (गुरव) यांनी भाजपच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवलेल्या विविध विकासकामांमुळे मतदारांचा विश्वास संपादन केला असून, जनतेने त्यांना महानगरपालिकेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे.
त्या शिर्डी साईबाबा संस्थानचे सेवानिवृत्त कर्मचारी चंद्रकांत उर्फ नाना गुरव यांच्या पुतणी असून, स्वर्गीय दीपक गुरव यांच्या त्या कन्या आहेत. त्यांच्या राजकीय यशामागे कुटुंबाची सामाजिक पार्श्वभूमी, जनतेशी असलेला थेट संपर्क आणि कार्यकुशलतेचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे.
विजयानंतर प्रतिक्रिया देताना नगरसेविका भाग्यश्री जोगंस (गुरव) म्हणाल्या की,
“साईबाबांचा आशीर्वाद आणि जनतेचे प्रेम यामुळेच हा विजय मिळू शकला. तसेच आमदार बबनराव लोणीकर यांच्या पाठबळामुळे मला ही संधी मिळाली. जालना शहराच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी मी प्रामाणिकपणे काम करेन.”
त्यांच्या या विजयाबद्दल शिर्डी व जालना परिसरातून त्यांचे अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत असून, भाजप कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

