शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी येथून सचिन कल्याणराव गीधे यांचे संशयास्पद अपहरण होऊन अनेक दिवस उलटूनही त्यांचा अद्याप शोध लागलेला नसल्याने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या गंभीर प्रकरणाकडे पोलीस प्रशासनाकडून होत असलेली दिरंगाई पाहता आता पीडित नातेवाईकांनी थेट राज्य सरकारकडे दाद मागण्याचा इशारा दिला असून, प्रकरणाला राज्यस्तरीय वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सचिन गीधे यांच्या कुटुंबीय व नातेवाईकांनी एकत्र येत पत्रकार परिषद व निवेदनाद्वारे तीव्र भावना व्यक्त करत सांगितले की,
“हा प्रकार केवळ मिसिंगचा नाही, तर सुनियोजित अपहरणाचा आहे. तरीही पोलीस तपास अत्यंत संथ असून दोषींना अप्रत्यक्ष संरक्षण दिले जात असल्याचा संशय आम्हाला येत आहे.”
नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार,
या प्रकरणातील संशयित आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असूनही आजतागायत एकाही आरोपीला अटक झालेली नाही, ही बाब धक्कादायक आहे. तपासात ठोस प्रगती न झाल्यामुळे कुटुंबीय मानसिक तणावाखाली असून प्रशासनाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
यावेळी संतप्त नातेवाईक म्हणाले,
“आम्ही वारंवार पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवले, पण केवळ आश्वासनांशिवाय काहीच मिळाले नाही. आता आम्ही थेट मा. मुख्यमंत्री, गृहमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदन देणार असून उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार आहोत.”
नातेवाईकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,
जर लवकरात लवकर सचिन गीधे यांचा शोध लागला नाही व दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील.
या प्रकरणात पोलीस प्रशासन खरोखर गांभीर्याने तपास करणार का?
की पुन्हा वेळकाढूपणा करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होणार?
हे पाहणे आता संपूर्ण जिल्ह्यासाठी कुतूहलाचा व संतापाचा विषय ठरला आहे.
DN SPORTS

