शिर्डी, दि. १६ —
नाशिक येथे २०२६-२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांची संभाव्य मोठी गर्दी लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने तयार केलेला ‘शिर्डी कृती आराखडा’ सर्वसमावेशक असून, त्याची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले. भाविकांची सुरक्षा, आरोग्य सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देण्यावर त्यांनी भर दिला.
सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाचा शिर्डीत सखोल आढावा

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी शिर्डी येथे आयोजित बैठकीत मुख्य सचिव श्री. अग्रवाल बोलत होते. या बैठकीस नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वाहतूक, पार्किंग व आपत्ती व्यवस्थापनावर विशेष भर
बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सादरीकरणाद्वारे प्रशासनाच्या तयारीची सविस्तर माहिती दिली. नाशिक कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांपैकी सुमारे २० ते २५ टक्के भाविक शिर्डी व शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी येतील, हे गृहीत धरून सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ‘एकात्मिक वाहतूक आराखडा’ तयार करण्यात आला असून, शहराबाहेर व मंदिर परिसरालगत सुमारे ९४ हेक्टर क्षेत्रावर ८ नवीन पार्किंग स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. या ठिकाणी स्मार्ट पार्किंग व्यवस्था व शटल बस सेवा उपलब्ध असणार आहे.
आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना अवघ्या १५ ते २० मिनिटांत घटनास्थळी पोहोचता यावे यासाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’ची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच गर्दी नियंत्रणासाठी ड्रोन व सीसीटीव्हीच्या माध्यमातून संवेदनशील ठिकाणांवर सतत नजर ठेवण्यात येणार आहे.
कनेक्टिव्हिटी, आरोग्य सुविधा व समन्वयाचे कौतुक
भाविकांच्या मदतीसाठी व गर्दी व्यवस्थापनासाठी विशेष प्रशिक्षित ‘क्राउड मार्शल्स’ तैनात करण्यात येणार आहेत. आरोग्य सुविधांच्या दृष्टीने श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसह परिसरातील रुग्णालये सज्ज ठेवण्यात येणार असून, अग्निशमन दलासाठी नवीन मल्टीपर्पज वाहने व प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी शिर्डी विमानतळावरून दररोज २० उड्डाणांचे नियोजन, तसेच देशातील १३ प्रमुख शहरांशी थेट रेल्वे संपर्काचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी नाशिकसाठी २००, तर छत्रपती संभाजीनगर व पुण्यासाठी प्रत्येकी ४० अतिरिक्त बसेस उपलब्ध करण्यात येणार आहेत. शनिशिंगणापूर येथेही स्वतंत्र पार्किंग व दर्शन रांग व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या या सर्वंकष आणि नियोजनबद्ध तयारीचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी कौतुक करत, सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि सुकर दर्शनाचा अनुभव देण्याच्या सूचना दिल्या.

