
संगमनेर तालुक्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांबाबत प्रशासनाने कोणतीही तडजोड करू नये, तसेच वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर मोक्का व एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट व ठाम निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विकासकामे व प्रशासकीय उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला.
साकुर येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, मियावाकी प्रकल्प, वनराई बंधारे तसेच प्रस्तावित स्मशानभूमीच्या जागेची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यासोबतच कासारा दुमाला येथील महिला बचत गटाच्या दुग्ध प्रक्रिया केंद्राला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली, तसेच निमोण येथील नियोजित सौरऊर्जा प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली.
प्रशासकीय पाहणीसोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी साकुर व खंडेरायवाडी येथील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन रब्बी पिकांची ई-पीक पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या. ई-पीक पाहणी व ॲग्रीस्टॅक योजनेचे काम मोहीम स्तरावर पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध वाळू उपसा व गौण खनिज उत्खनन या विषयावर सखोल चर्चा केली.
अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाई होईल, असा इशारा देत त्यांनी पोलीस व महसूल प्रशासनाला समन्वयाने काम करण्याचे आदेश दिले.
कायद्याचा दरारा निर्माण करण्यासाठी कठोर निर्णय आवश्यक असून, संगमनेर तालुक्यात गुन्हेगारीला कोणतीही माफी नाही, असा स्पष्ट संदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी या दौऱ्यातून दिला

