
श्रीरामपूर विभागात १७ पोलीस स्टेशन हद्दीतून गहाळ झालेले ५२ मोबाईल शोधून मूळ मालकांच्या हाती
श्रीरामपूर | प्रतिनिधी – साईदर्शन न्यूज
अहिल्यानगर उत्तर विभागातील श्रीरामपूर विभागामध्ये गहाळ व चोरीस गेलेल्या मोबाईल प्रकरणांचा छडा लावत पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. विभागातील १७ पोलीस स्टेशन हद्दीतून विविध ठिकाणी गहाळ झालेले वेगवेगळ्या कंपन्यांचे एकूण ५२ महागडे मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले असून, त्यांची अंदाजे किंमत सहा लाख रुपये इतकी आहे. विशेष बाब म्हणजे हे सर्व मोबाईल शोधून काढत मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.
🔍 तांत्रिक विश्लेषणातून उलगडा
IMEI ट्रॅकिंग, सायबर विश्लेषण व नेटवर्क तपासाचा वापर
गहाळ मोबाईल बाबत दाखल झालेल्या तक्रारींच्या आधारे श्रीरामपूर विभागातील पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, IMEI ट्रॅकिंग, नेटवर्क अॅक्टिव्हिटी तपास, सायबर डेटाचे विश्लेषण अशा आधुनिक पद्धतींचा वापर करून तपास सुरू केला. दीर्घकाळ चाललेल्या या तपासातून वेगवेगळ्या ठिकाणी वापरात असलेले मोबाईल शोधून काढण्यात यश आले.
गहाळ मोबाईल वेगवेगळ्या व्यक्तींकडे, वेगवेगळ्या भागात वापरात असल्याचे निष्पन्न झाले. काही मोबाईल पुन्हा विक्रीद्वारे हात बदलून गेले होते, तर काही मोबाईल थेट संशयास्पद व्यक्तींकडून वापरले जात होते.
⚠️ गहाळ मोबाईल म्हणजे गुन्हेगारांचे हत्यार
दिशाभूल, सायबर गुन्हे आणि डिजिटल पुरावे पुसण्याचा डाव
पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. गहाळ किंवा चोरीस गेलेले मोबाईल हे सायबर गुन्हेगार, फसवणूक करणारे टोळके व इतर गुन्हेगारांकडून गुन्हे करण्यासाठी वापरले जात आहेत.
गुन्हेगार स्वतःचा डिजिटल ठसा न राहावा, तसेच तपासाची दिशा मूळ मोबाईल मालकाकडे वळावी, यासाठी अशा मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे निष्पाप नागरिकांना पोलीस चौकशी, सायबर तपास व कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
📢 नागरिकांना थेट इशारा व आवाहन
मोबाईल गहाळ झाला तर तात्काळ तक्रार करा
अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपूर यांच्या वतीने नागरिकांना स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे की –
मोबाईल गहाळ झाल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा
मोबाईलचा IMEI क्रमांक सुरक्षित ठेवा
अनोळखी किंवा संशयास्पद मोबाईल खरेदी करणे टाळा
सायबर पोर्टलवर गहाळ मोबाईलची नोंद करणे आवश्यक आहे
यामुळे भविष्यातील सायबर गुन्हे टाळण्यास मोठी मदत होणार आहे.
👮♂️ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई
ही संपूर्ण कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर
मा. श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर
यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
या मोहिमेत
पो.नि. नितीन देशमुख (श्रीरामपूर शहर पो. स्टे.),
पो.नि. संजय ठेंगे (राहुरी पो. स्टे.),
तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपूर येथील
पो.उपनि. चारुदत्त खोंडे,
पो.हे.कॉ. शंकर चौधरी, संतोष दरेकर, दादासाहेब लोढे, सचिन धनाड,
पो.ना. संदीप दरंदले, रामेश्वर वेताळ,
पो.कॉ. सहदेव चव्हाण, अशोक गाढे,
श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे
पो.हे.कॉ. सुरज गायकवाड, राहुल यादव,
पो.कॉ. प्रमोद ढाकणे, सतिष कुऱ्हाडे, नदीम शेख, सचिन ताजणे
यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण व मेहनतीने ही कारवाई पार पाडली.
✅ पोलिसांचा ठाम संदेश
“गहाळ मोबाईल म्हणजे केवळ आर्थिक नुकसान नव्हे, तर तो गुन्हेगारांच्या हातातील शस्त्र ठरू शकतो.”

