
शिर्डी | प्रतिनिधी – साईदर्शन न्यूज
शिर्डी ही श्रद्धेची नगरी असली तरी नाताळसारख्या सणांच्या दिवशी काही बेफिकीर व दादागिरी करणारे इसम कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतात, याचे जिवंत उदाहरण मंगळवारी रात्री लक्ष्मीनगर चौकात पाहायला मिळाले. नाताळ निमित्त प्रचंड भाविक व वाहनांची गर्दी असताना वाहतूक नियंत्रणाचे अत्यंत जबाबदारीचे काम बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांशी दोन इसमांनी थेट हुज्जत घालून अरेरावी केली.
या प्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास लक्ष्मीनगर चौक, शिर्डी येथे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोहेकॉ. सुधाकर प्रल्हाद काळोखे, पोनि. रणजित गलांडे, पोउनि. सागर काळे तसेच एसआरपीएफ प्लाटूनचे जवान कर्तव्यावर तैनात होते. त्या वेळी वाहतूक कोंडी गंभीर स्वरूपाची होती व पोलिसांकडून नियोजनबद्ध पद्धतीने वाहने मार्गस्थ केली जात होती.
अशा संवेदनशील परिस्थितीत चंदन गबरुसिंग राजपूत (वय ३४, रा. पानमळा, शिर्डी) व सुदाम बाळासाहेब कालंगडे (वय ४५, रा. कालंगडे वस्ती, निमगाव खैरी, ता. श्रीरामपूर) हे दोघे घटनास्थळी आले. कोणतेही कारण नसताना त्यांनी पोलिसांना उद्देशून
“तुम्ही कसे काय इथे गाड्या काढत आहात? तुम्हाला काही समजते का?”
असे अपमानास्पद शब्द वापरत थेट वाद घालण्यास सुरुवात केली.
कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांनी संयम राखून त्यांना परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही इसमांनी अधिकच उद्दामपणा करत हुज्जत घातली, अरेरावी केली आणि पोलिसांच्या अंगावर धावून जाऊन शासकीय कामकाजात थेट अडथळा निर्माण केला. त्यांच्या या बेजबाबदार वर्तनामुळे आधीच विस्कळीत असलेली वाहतूक अधिकच कोलमडली व भाविकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.
पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत संबंधित इसमांना बाजूला केले असता चंदन राजपूत हा तेथून पळ काढून निघून गेला, तर सुदाम कालंगडे हा वारंवार वाद घालत असल्याने त्यास ताब्यात घेऊन शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले.
या घटनेबाबत पोहेकॉ. सुधाकर प्रल्हाद काळोखे यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली असून, दोन्ही आरोपींविरोधात शासकीय कामात अडथळा आणणे, अरेरावी करणे व पोलिसांशी हुज्जत घालणे या गंभीर स्वरूपाच्या कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फरार आरोपी चंदन राजपूत याचा शोध पोलीस घेत आहेत.
दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देताना उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला आहे.
“सण-उत्सवाच्या काळात भाविकांची सुरक्षा व शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असतात. पोलिसांशी हुज्जत घालणारे, दादागिरी करणारे किंवा शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही. अशांवर कठोर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेमुळे शिर्डी शहरात कायदा हातात घेणाऱ्यांना स्पष्ट संदेश गेला असून, पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केल्यास थेट गुन्हा आणि कडक कारवाई अटळ असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

