शिर्डी : प्रतिनिधी
संस्थेच्या नव्या जागेच्या प्रस्तावावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक संघर्ष झाल्याचे चित्र सभागृहात पाहायला मिळाले. विरोधकांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांना प्रत्युत्तर देताना चेअरमन विठ्ठलराव पवार यांनी विरोधकांची भूमिका दुटप्पी असल्याचा घणाघाती आरोप केला. सत्तेत असताना युनियन बँकेची इमारत तब्बल ११ कोटी रुपयांना खरेदी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी आज नव्या जागेच्या प्रस्तावाला विरोध करणे, ही भूमिका सभासदांनी समजून घ्यावी, असेही पवार यांनी ठणकावून सांगितले.
सभेत सुमारे ५५० सभासदांच्या सह्यांचा दावा करण्यात आला असून, संस्थेशी संबंधित प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सभासदांची भूमिका आणि हित लक्षात घेतले जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले. नव्या जागेसंदर्भात कोणताही निर्णय मनमानी पद्धतीने घेतला जाणार नसून, संबंधित सभासदांचे मत विचारात घेऊन तसेच आवश्यक ती लेखी संमती घेतल्यानंतरच पारदर्शक पद्धतीने पुढील निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, संस्थेच्या एका इमारतीच्या बांधकामासंदर्भात २०१६ ते २०२६ या कालावधीतील प्रकरणाची शासकीय पातळीवर चौकशी सुरू असल्याने, कायदेशीर बाबी पूर्ण होईपर्यंत त्या ठिकाणी कोणतेही काम करणे शक्य नसल्याचे पवार यांनी सांगितले. सदर चौकशी पूर्ण झाल्यानंतर आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर या वास्तूचा उपयोग साईभक्त आणि सभासदांच्या हितासाठी करण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संस्थेच्या भविष्यातील विस्ताराचा विचार करून नव्या जागेची आवश्यकता निर्माण झाली आहे. या ठिकाणी बॉटल प्रकल्प, प्रसाद निर्मितीचा आधुनिक कारखाना तसेच शहर कार्यालयासाठी आवश्यक सुविधा उभारण्याबाबत विचार सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले. मात्र, हा निर्णय कोणत्याही व्यक्तीच्या मनमानीने घेतला जाणार नाही. संस्थेच्या नियमांनुसार आणि सभासदांचा विश्वास संपादन करूनच पुढील पावले उचलली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
पवार यांनी संस्थेच्या कार्यकाळातील विविध निर्णयांचा आढावा घेत विरोधकांवर टीकेची झोड उठविली. सभासदांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून, अन्न व औषध प्रशासनाच्या एफडीएच्या निकषांचे पालन करून दर्जेदार आणि अधिक काळ टिकणाऱ्या प्रसादाच्या निर्मितीबाबतही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेचे संस्थापक बळीरामजी कोते पाटील यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा जपत संस्थेचा कारभार पारदर्शकपणे सुरू असल्याचे सांगताना पवार यांनी विरोधकांना मागील निवडणुकीच्या निकालाचीही आठवण करून दिली. मागील निवडणुकीत विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने ऐतिहासिक विजयाची नोंद करत विरोधकांचे डिपॉझिट जप्त केले होते, असा दावा त्यांनी यावेळी केला.
यापुढील काळात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सभासदांच्या आणि संस्थेच्या हिताचेच निर्णय घेतले जातील, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.
“केवळ सभासद आणि संस्थेच्या हिताचेच निर्णय घेतले जातील. राजकीय द्वेषातून विरोध करणाऱ्यांना केवळ आरोपांनी नव्हे, तर प्रत्यक्ष कामातूनच चोख उत्तर दिले जाईल,” असा ठाम निर्धार चेअरमन विठ्ठलराव पवार यांनी व्यक्त केला.
या बैठकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर काळे, संदीप उदावंत यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी चेअरमन विठ्ठल पवार, व्हाईस चेअरमन पोपटराव कोते यांच्यासह संचालक मंडळातील पदाधिकारी, संचालक, सचिव विलास वाणी, सहसचिव बाबासाहेब अनर्थे, सहाय्यक सहसचिव संभाजी कोते तसेच संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेदरम्यान नव्या जागेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या जोरदार शाब्दिक संघर्षामुळे सभागृहातील वातावरण काही काळ चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.
